7 दिवसांची पोलीस कोठडी, कट उघड होणार ?
डेहराडून / वृत्तसंस्था
गणतंत्रदिनी आंदोलक शेतकऱयांच्या ट्रक्टर मिरवणुकीत झालेल्या हिंसाचाराचा प्रमुख सूत्रधार मानला गेलेला दीप सिद्धू याला अटक करण्यात आली आहे. त्याने त्या दिवशी लाल किल्ल्यावर अन्य ध्वज लावून राष्ट्रध्वजाचा अपमान केला होता, असा आरोप आहे. त्याच्या चौकशीत या हिंसाचाराचा कट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याच्यावर 1 लाखाचे इनाम ठेवण्यात आले होते.
त्याला पंजाबच्या जिरकपूर येथे मंगळवारी दुपारी 3 च्या आसपास अटक करून न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. त्याला शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांनी पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथे 44 ठिकाणांवर धाडी टाकल्या होत्या.
या हिंसाचाराशी संबंध असणाऱया 127 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. तसेच 44 तक्रारी सादर करण्यात आल्या आहेत. सध्या दिल्लीत सिंघू, तिकरी आणि गाझीपूर अशा तीन ठिकाणी आंदोलन सुरू असून तिन्ही स्थानांवर कडेकोट पोलीस सुरक्षा ठेवण्यात आली आहे.
26 जानेवारीच्या गणतंत्रदिनी झालेल्या हिंसाचारामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. हिंसाचाऱयांविरोधात कठोर करवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. या हिंसाचारात पोलिसांवर हल्ले करण्यात आले. मात्र, पोलिसांनी अतिशय संयमाने परिस्थिती हाताळल्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली होती.
थरूर, सरदेसाई यांना दिलासा
पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी हिंसाचार सुरू असताना ट्विट करून एका शेतकऱयाचा गोळीबारात मृत्यू झाल्याचा संदेश पसरविला होता. त्यामुळे त्यांच्यावर अफवा पसरविणे आणि दंगल भडकविण्याचा प्रयत्न करणे असे आरोप ठेवून कारवाई सुरू करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी अटक टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांना तसेच काँगेस नेते शशी थरूर यांना न्यायालयाने दिलासा देत त्यांच्या अटकेवर स्थगिती दिली आहे.