प्रतिनिधी / बेळगाव
कणबर्गी येथील शांतीसागर गल्ली, गोकाक रोडला जोडणारा छकडी गाडीमार्ग सोडण्यात आला होता. सदर रस्ता मागील 100 वर्षांपासून वापरात आहे. या रस्त्यावरून गावातील नागरिक ये-जा करीत असतात. मात्र, सदर रस्ता बंद करण्यात आला असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सदर रस्ता खुला करून द्यावा, अशा मागणीचे निवेदन श्री सिद्देश्वर शेतकरी संघटनेच्यावतीने महापालिकेला देण्यात आले.
गावामध्ये विविध रस्ते सोडण्यात आले आहेत. या अंतर्गत शांतीसागर गल्ली परिसरात छकडी गाडीमार्ग सोडण्यात आला होता. पण सदर रस्त्यावर संरक्षक भिंत घालण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. जनावरे ने-आण करण्यासाठी तसेच छकडी गाडीद्वारे गवत आणि शेणखत नेण्यासाठी या रस्त्याचा वापर करण्यात येत होता. पण काहींनी याबाबत तक्रार करून रस्त्यावर अडथळा निर्माण केला आहे. तत्कालीन महापौर शिवाजी सुंठकर यांनी 1993 मध्ये सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाजूने अर्धा कि. मी. रस्ता 15 फुटांचा निर्माण केला होता. काहींनी रस्ता करण्यास सहमती दर्शवली होती. पण या रस्त्यावर संरक्षक भिंत बांधून रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱयांची व ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. सदर रस्ता खुला करावा, अशा मागणीचे निवेदन संघटनेच्यावतीने देण्यात आले. निवेदनाची प्रत उत्तर विभागाचे शहर अभियंते गंगाधर यांच्याकडे देण्यात आली.
यावेळी बबन मालाई, भरमाण्णा कडोलकर, ओमाण्णा मालाई, रेणुका मालाई, गंगुबाई कडोलकर, रेणुका मालाई, सुधा मालाई, एस. बी. मालाई यांच्यासह नागरिक उपस्थित होते.