चेन्नई : भारताचा नवोदित सनसनाटी जलद गोलंदाज टी. नटराजनची तामिळनाडू संघातून मुक्तता केली गेली आहे. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, नटराजन हा विजय हजारे चषक वनडे स्पर्धेत तामिळनाडूतर्फे खेळणार होता. पण, पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्ध होणाऱया मर्यादित षटकांच्या मालिकेत तो ताजातवाना रहावा, यासाठी बीसीसीआयने तामिळनाडू संघटनेशी संपर्क साधला व त्याला संघातून मुक्त करण्याची विनंती केली होती.
‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व भारतीय संघव्यवस्थापनाला नटराजन इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेसाठी हवा आहे आणि आम्हीही भारतीय संघाचे हित समोर ठेवत या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिला’, असे तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे सचिव आर. एस. रामास्वामी यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
टी. नटराजनची मुक्तता केल्यानंतर आता तामिळनाडूच्या 20 सदस्यीय संघातील त्याची जागा आर. एस. जगनाथ श्रीनिवास हा घेईल. तामिळनाडू संघ या स्पर्धेसाठी दि. 13 फेब्रुवारी रोजी इंदोरला रवाना होणार आहे. ही स्पर्धा दि. 20 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. तामिळनाडू संघाने अलीकडेच अहमदाबादमध्ये सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धा जिंकली आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील पहिली टी-20 लढत मार्च 12 रोजी अहमदाबादमध्ये तर पहिली वनडे पुण्यात दि. 23 मार्च रोजी खेळवली जाणार आहे. नटराजन अलीकडेच ऑस्ट्रेलिया दौऱयात एकाच वेळी तिन्ही क्रिकेट प्रकारात पदार्पण करणारा पहिला खेळाडू ठरला. ब्रिस्बेनमध्ये भारताने कसोटी मालिका जिंकली, त्यावेळी त्या संघातही नटराजनचा समावेश होता.