जिल्हाधिकाऱयांसमोर शेतकऱयांनी मांडल्या समस्या : लवकरच पुन्हा बैठक
प्रतिनिधी / बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्त्यासंदर्भात शेतकऱयांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी शेतकऱयांनी कोणत्याही परिस्थितीत आम्ही या रस्त्यासाठी एक इंचही जमीन देणार नाही, असे ठणकावून सांगितले. याचबरोबर दडपशाही करत तुम्ही रस्त्याचे काम करण्याचा प्रयत्न करत आहात. हा न्यायालयाचा अवमान असून त्यावर तुम्ही गांभिर्याने विचार करा, अन्यथा शेतकरी शांत बसणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.
हलगा-मच्छे बायपास रस्त्याबाबत न्यायालयाने मनाई दिली आहे. असे असताना दोन दिवसांपूर्वी मच्छे येथून रस्त्याचे काम करण्यासाठी कंत्राटदार पोलीस फौजफाटय़ासह दाखल झाला होता. त्याला शेतकऱयांनी तीव्र विरोध दर्शविला.
कोणत्याही परिस्थितीत आम्ही रस्ता करायला देणार नाही. असा इशारा देऊन त्यांनी तेथेच ठाण मांडले. पोलीस बंदोबस्तात रस्त्याचे काम सुरू करण्याचा हा प्रयत्न होता. तो शेतकऱयांनी हाणून पाडला. यामुळे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बैठक बोलावून शेतकऱयांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी जोरदार विरोध केला. जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी तुमच्या काय मागण्या आहेत त्या सांगा मी त्याबाबत सरकारकडे पाठपुरावा करू असे सांगितले. रक्कम वाढवून देऊ, असेही ते म्हणाले. मात्र शेतकऱयांनी आम्हाला रक्कम नको, तसेच इतर कोणतीही आमिषे दाखवू नका, असे सांगितले.
त्यावर शेतकऱयांचा आम्ही आदर करतो, त्यांना कोणताही त्रास होऊ नये, अशी भूमिका पार पाडू, असे आश्वासन हिरेमठ यांनी दिले. महत्त्वाचे म्हणजे या रस्त्याची पाहणी स्वतः करून तुमचे म्हणणे ऐकूण सरकारकडे पाठपुरावा करू, असेही त्यांनी सांगितले.
पर्यायी मार्गाचा विचार करा
सध्या हलगा-मच्छे बायपाससाठी जी जमीन घेण्याचा प्रयत्न सुरु आहे ती तिबारपिकी आहे. त्यामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान होणार आहे. यापूर्वी शेतकऱयांनी पर्यायी मार्गाचा विचार करावा, असे सरकारला सूचविले होते. त्याची दखल तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतली होती. 2016 मध्ये झालेल्या बेळगाव अधिवेशनामध्ये पर्यायी मार्गाबाबत चर्चा करून सहमती दर्शविण्यात आली होती. त्याबाबत अधिवेशनामध्ये ठरावही झाला होता, असे शेतकऱयांनी यावेळी सांगितले.
पर्यायी मार्ग कोंडुसकोप्प, धामणे, यरमाळ, राजहंसगड, देसूर ते खानापूर असा होता. या परिसरातील जमीनही खडकाळ व माळवट आहे. तेव्हा या मार्गाचा विचार होणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीला रयत संघटनेचे नेते चन्नाप्पा पुजेरी, जयश्री गुळण्णावर, रयत संघटेनेचे जिल्हाध्यक्ष सत्याप्पा मल्लापूर, सचिव रवी सिद्धमणावर, गणेश जिरगाळ, प्रकाश नायक, राजीव मरवे, रमाकांत बाळेकुंद्री, हणमंत बाळेकुंद्री, भोमेश बिर्जे, तानाजी हलगेकर, मनोहर कंग्राळकर, विनायक हलगेकर, अनिल अनगोळकर, भैरु पोमाणाचे, लक्ष्मण देमजी, सुरेश मऱयाकाचे, महेश चतूर, यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
सहमतीशिवाय कामाला सुरुवात होणार नाही
शेतकऱयांनी सहमती दर्शविल्याशिवाय रस्त्याचे काम करण्यासाठी कोणीही येऊ नये असे म्हणणे शेतकऱयांनी मांडले. त्यावर जिल्हाधिकाऱयांनी यापुढे कोणीही त्या ठिकाणी येणार नाही, अशी हमी शेतकऱयांना दिली.