सीतारामन यांनी फेटाळले राहुल गांधींचे आरोप : वैयक्तिक पातळीवरील टीकेने काँग्रेस आक्रमक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संसदेच्या अधिवेशनादरम्यान सुरू असलेल्या अर्थसंकल्पावरील चर्चेत आता वैयक्तिक पातळीपर्यंत टीका होत असल्याचे शुक्रवारी निदर्शनास आले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली. 2021-22 चा अर्थसंकल्प ‘आत्मनिर्भर भारता’च्या दिशेने वाटचाल करणारा असून सरकार प्रत्येक घटकासाठी काम करीत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच भांडवलशाहीसंबंधी झालेले आरोपही त्यांनी खोडून काढले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेवर उत्तर दिले. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पातील चांगल्या गोष्टी सांगत विरोधी पक्षावर निशाणा साधला. गरिबांसाठी आम्ही जे काम करत आहोत आणि गरजूंसाठी जी पावले उचलली जात आहेत, त्याच्या विरोधात विरोधकांमधील काही लोकांना आरोप लावण्याची सवय झाली आहे. सरकार फक्त जवळच्या मित्रांसाठी काम करत असल्याच्या खोटय़ा गोष्टी पसरवण्यात आल्या. कोरोना संसर्गाच्या काळात 80 कोटी लोकांना धान्य मोफत देण्यात आले. 8 कोटी लोकांना एलपीजी मोफत देण्यात आले. 40 कोटी लोक, शेतकरी, महिला, अपंग आणि गरिबांच्या खात्यात थेट निधी वर्ग करण्यात आला याचा दाखला त्यांनी दिला.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेमध्ये गुरुवारी सहभाग नोंदवला होता. यावेळी त्यांनी केवळ चार जण देशाची सत्ता चालवत असल्याचा आरोप केला होता. अर्थसंकल्पात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) मालकांची फसवणूक झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. हे सर्व आरोप अर्थमंत्र्यांनी फेटाळले आहेत. ‘भांडवलदारांचा अर्थसंकल्प’ या आरोपाचा संदर्भ देत सरकार गरीब किंवा उद्योजक असो, लोकांच्या प्रत्येक घटकासाठी काम करीत आहे. आमच्यावर भांडवलशाहीचा आरोप करणे निराधार आहे. सौभाग्य योजनेंतर्गत खेडय़ांमधील रस्तेनिर्मिती, प्रत्येक गावात वीजनिर्मिती, शेतकऱयांच्या खात्यात पैसे जमा करणे यासारख्या योजना भांडवलदारांसाठी नसतात, असे त्यांनी सांगितले. सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्राच्या भांडवली खर्चामध्ये 18 टक्क्मयांपेक्षा जास्त वाढ केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘जावया’वर साधला निशाणा
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात ‘जावई’ या शब्दाचा वापर करत काँग्रेसवर निशाणा साधला. मुद्रा योजनेंतर्गत 27 हजार कोटीहून अधिक कर्ज दिले गेले. या योजनेचा लाभ कोणी घेतला? जावयांनी घेतला का? असे म्हणताच विरोधी पक्षाने आक्षेप घेतला. त्यावर स्पष्टीकरण देताना ‘जावई’ हा काँग्रेसचा टेडमार्क आहे असे मला वाटत नाही. जावई प्रत्येक घरात असतो, पण काँग्रेसमध्ये हे एक खास नाव आहे, असे त्या म्हणाल्या.
रॉबर्ट वाड्रांकडे अर्थमंत्र्यांचा रोक निर्मला सीतारामन स्पष्टपणे काही बोलल्या नाहीत, परंतु त्यांचा अर्थ असा होता की सरकार जावयासाठी नव्हे तर गोरगरिबांसाठी काम करत आहे. जावई या शब्दाचा वापर करताना त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियंका यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचा उल्लेख करत असल्याचे स्पष्ट होत होते. भूमी घोटाळय़ांमध्ये भाजपने अनेकवेळा वाड्रा यांचे नाव घेतले आहे. राजस्थानमधील बिकानेरमधील जमीन करारात वाड्रा यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा खटलाही सुरू आहे.