क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर आज रविवारी बेंगलोर एफसी आणि एफसी गोवा यांच्यात सातव्या हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेतील महत्वाची लढत होणार आहे. दोन्ही संघांना बाद फेरीसाठी ही लढत महत्वाची असेल.
दोन सामने बाकी असताना बेंगलेंरसाठी जिंकू किंवा मरू अशी स्थिती आहे. पहिल्या चार संघांच्या तुलनेत ते पाच गुणांनी मागे असले तरी अजूनही बाद फेरीची किंचित संधी त्यांना आहे. त्यासाठी त्यांनी उरलेले दोन सामने जिंकावेच लागतील आणि त्यांचे प्रतिस्पर्धी गुण गमावतील अशी आशा बाळगावी लागेल.
बेंगलेंर एफसीचे प्रशिक्षक नौशाद मुसा यांनी आपल्या संघाने अवास्तव दडपण घेतले नसल्याचे ठामपणे सांगितले. बाद फेरीचे अकारण दडपण आम्ही घेतलेले नाही. विजय मिळाल्यास आम्ही जवळपास जाऊ, पण विजयासाठी उतावीळ झाल्यास आमचे डावपेच चुकू शकतात असे मुसा म्हणाले. आम्हाला शांतचित्ताने खेळायचे आहे. सामन्यावरील लक्ष केंद्रित ठेवायचे आहे आणि आमच्या शैलीचा खेळ करायचा आहे, असे मुसा म्हणाले.
बेंगलोर एफसीला आव्हान सोपे नसेल, कारण लीगमधील एका सर्वाधिक भेदक आणि आक्रमक प्रतिस्पर्ध्याचा त्यांना सामना करायचा आहे. एफसी गोव्याचे 26 पैकी 16 गोल दुसऱया सत्रात झाले आहेत. यातही 10 गोल शेवटच्या पंधरा मिनिटांत झाले आहेत, जे प्रमाण कोणत्याही संघापेक्षा जास्त आहे.
एफसी गोव्याचा संघ चेंडूवरील ताबा चांगला ठेवतो. त्यात ते तरबेच आहेत, असे मुसा म्हणाले. आमच्यासाठी परिस्थिती सोपी नसेल. ते अखेरच्या टप्प्यात गोल करतात आणि त्यामुळे आम्हाला या बाबतीत सावध राहावे लागेल, असे मुसा म्हणाले. दुसरीकडे ओडिशावरील विजयाचा फॉर्म राखण्याचा आणि मोहिम पुढे नेण्याचा एफसी गोवाचा निर्धार असेल. त्या विजयामुळे सलग सहा बरोबरींची मालिका खंडित करणे त्यांना शक्य झाले.
एफसी गोवाचा संघ बाद फेरीच्या तणावपूर्ण शर्यतीत सहभागी आहे. दोन सामने बाकी असताना हैदराबाद आणि नॉर्थईस्ट यांच्याइतकेच त्यांचे गुण आहेत. एफसी गोवासाठी एक बाब मात्र चिंतेची आहे आणि ती म्हणजे बचावफळीची कामगिरी, ज्यामुळे सात सामन्यांत त्यांना एकही क्लीन शीट राखता आलेली नाही. बेंगलोरविरूद्धच्या सामन्यात विजय मिळाला नाही तर त्यांना पहिल्या चार संघांतील स्थान गमवावे लागेल. दोन्ही संघ विजयासाठी आतूर असल्यामुळे खूप काही पणास लागलेले असेल, असे एफसी गोवाचे प्रशिक्षक जुआन फॅरांडो म्हणाले.
सामना आमच्यासाठी आणि बेंगलोरसाठीही अवघड असेल. तीन गुण मिळविणे महत्वाचे असेल व ते मिळाल्यास आम्हाला बाद फेरीची जास्त संधी असेल, असे फॅरांडो म्हणाले. बेंगलोरला शेवटच्या सामन्यांत सहा गुण हवे आहेत. हा सामना चुरशीचा होईल, कारण आमच्या दोन्ही संघांची मानसिकता सारखीच आहे, असे फॅरांडो शेवटी म्हणाले.