शिक्षण विभागाकडून शाळांच्या वेळेत बदल
प्रतिनिधी/ रत्नागिरी
दिवसेंदिवस वाढणारा उन्हाचा तडाखा लक्षात घेता जिल्ह्य़ातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य संतोष थेराडे यांनी केली होती. या मागणीची दखल घेत मुलांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर दीर्घ काळ शाळा बंद होत्या. मात्र रुग्ण कमी होऊ लागल्यानंतर विशिष्ट नियमांचे पालन करून 5 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा शासनाच्या निर्देशानुसार घडय़ाळी 4 तासांसाठी सुरु आहेत. जिल्हा परिषदेच्या 5वी ते 8वीच्या पावणेतीन हजार शाळांपैकी 70 टक्केहून अधिक शाळा सुरु आहेत. अजूनही 1 ली ते 4 थीच्या शाळा मात्र बंद आहेत.
जिल्हय़ात गेल्या आठवडाभरापासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. दुपारच्या सत्रात शाळा भरत असल्यामुळे विद्यार्थ्यांना भर उन्हातून घरी परतावे लागते. यामध्ये आरोग्याचा प्रश्नही उद्भवण्याची शक्यता आहे. अनेक गावांमध्ये एसटीची सेवाही बंद आहे. ही समस्या जि. प. सदस्य संतोष थेराडे यांनी एका निवेदनाद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत यावर तत्काळ कार्यवाहीची मागणी केली होती. या पत्राची दखल घेत शिक्षण विभागाकडून शाळांना वेळेत बदल करण्याचे पत्र निर्गमित करण्यात आले आहे. या सूचनांनुसार जिल्हय़ातील 5 वी ते 8 वीपर्यंतच्या शाळा सकाळी 7.30 ते सकाळी 11.30 या वेळेत भरवण्यात येतील, संतोष थेराडे यांनी प्रशासनाच्या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त केले आहे.