प्रतिनिधी/ सातारा
राजवाडा ते मंगळवार तळे मार्गावर बुधवारी अतिक्रमण विभागाने पुन्हा एकदा कारवाई केली. यावेळी लहान-सहान भाजी विक्रेत्यांचे वजनकाटय़ा सारखे साहित्य जप्त करण्यात आले. त्यामुळे येथील भाजी विक्रेत्यांना मोठ्ठा त्रास सहन करावा लागला. काही विक्रेत्यांनी अतिक्रमन विभागाचे हे पथक येताच आपल्या साहित्यासह पोबारा केला.
अनेकदा अतिक्रमन विभागाने या परिसरात कारवाई करत गोरगरीब भाजी विक्रेत्यांचे साहित्य जप्त केले आहे. पण ज्या ठिकाणी खरच कारवाई करण्याची गरज असते तेथे मात्र याविभागातर्फे कानाडोळा करण्यात येतो. त्यामुळे केवळ नावाला कारवाई करायची म्हणून या गोर-गरीब विक्रेत्यांच्या पोटावर पाय देण्याचा प्रयत्न हा या विभागाने चालविला आहे.
सातारा शहरातील बऱयाच ठिकाणी टपरीवाले बेकायदेशीर रित्या ठाण मांडुन बसले आहेत. या टपऱयांची संख्या पाहता आता सातारा शहराची ओळख ही टपऱयांचे शहर म्हणून होतेय की काय? असा प्रश्न सध्या पडत आहे. पण याकडे मात्र या अतिक्रमन विभागाने कानाडोळा केला आहे. त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात येत नाही. काही वेळा पोकळ कारवाई करण्यात येते. पुन्हा टपरी जैसे थे अशाच स्वरूपात असते.