पालकमंत्री जयंत पाटील यांची अपेक्षा
प्रतिनिधी / सांगली
अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा घेतल्याचा निर्णय योग्यच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा पक्ष संघटनेच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
सीबीआयने आता अनिल देशमुख यांच्या बरोबरच त्यांच्या आधीच्या चार पाच वर्षांच्या गृहमंत्रालयाच्या कारभाराचीही चौकशी करावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयात जयंत पाटील यांनी कोरोनाचा आढावा घेतला त्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
जयंत पाटील म्हणाले, उच्च न्यायालयाने एका याचिकेवर निर्णय देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याही चौकशीचे आदेश दिले होते. त्यामुळे गृहमंत्रीपदावर राहणे योग्य नसल्याने त्यांनी आपल्याशी चर्चा केली होती. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीही चर्चा करून त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. तो योग्यच असल्याचे सांगून देशमूख यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादी बॅकफूटवर गेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गृहमंत्रीपदाबाबत विचारले असता मात्र तो निर्णय मुख्यमंत्री घेतील. त्याला तिनही पक्षांचा पाठींबा असेल असे त्यांनी सांगितले.
वनखात्याकडे लक्ष द्यावे लागेल
सांगली शहरात बिबट्या सापडला ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. असे सांगून जयंत पाटील यांनी आता आम्हाला वन खात्याकडे लक्ष दिले पाहिजे अशी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली. चांदोली अभयारण्यात ब्रिडिंग सेंटर उभा करणार आहोत. जंगलातील प्राणी शहरात येणे हे घातक असल्याचेही त्यांनी सांगितले.