शेकडो संशयित रूग्णांची चाचणीसाठी रांगच रांग – कोरोनाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता
प्रतिनिधी / रत्नागिरी
गेल्या सात आठ महिन्यापासून रत्नागिरीत महिला रूग्णालय हे कोरोना सेंटर म्हणून सुरू आहेत जिल्हाभरातील रूग्ण याठिकाणी दाखल होत असतात. या आठवड्यात 200 हून अधिक रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळत असल्याने सध्या हे कोरोना सेंटर फुल्ल झाले आहे. मात्र अजूनही रूग्ण बेड मिळावा म्हणून याच रूग्णालयात गर्दी करतानाचे दृष्य सोमवारी पहावयास मिळाले. तसेच स्वॅब टेस्टसाठी याच ठिकाणी शेकडो रूग्णांची रांगच रांग लागत आहे. जिल्हा शासकीय रूग्णालय सुध्दा कोव्हिड सेंटर म्हणून सुरू करण्यात आले असून याठिकाणी चार वार्ड तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून देण्यात आली आहे.
नागपूर, नाशिक आणि पुण्यामध्ये रूग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याच्या घटना समोर आहेत मात्र रत्नागिरीत जिल्ह्यात सध्यस्थिती अशी नसली तरी माहिती अभावी सोमवारी अनेक रूग्णांनी महिला रूग्णालयात गर्दी केली होती. याच महिला रूग्णालयात कोरोना चाचणी आणि रूग्णांना दाखल करून घेण्याची पकिया होत असल्याने या गर्दीत आणखीन वाढ होत आहे. सोमवारी ही गर्दी कमी करताना आरोग्य कर्मचाऱयांनाही नाकीनऊ आले होते. रत्नागिरी गेल्या चार पाच दिवसात 24 तासात 200 हून अधिक रूग्ण पॉझिटीव्ह येत असल्याने आता आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात 18 आयसीयु बेड तर 72 बेड चे चार वार्ड तयार करण्यात आलेले आहेत. मात्र महिला रूग्णालयातून ऍडमिशन पकिया पूर्ण करून सिव्हीलमध्ये दाखल व्हावे लागणार आहे. याशिवाय कुवारबावचे समाजकल्याण भवन आणि सन्मित्रनगर येथील बीएड कॉलेजमध्ये कोरोनाचे रूग्ण दाखल करून घेण्यात आले आहे.