प्रतिनिधी / बेंगळूर
देशभरात उपलब्ध असलेला रासायनिक खताचा साठा यापुर्वीच्या दरानेच विक्री करण्यास खत उत्पादकांनी संमती दर्शविली आहे. इफ्को, आयपीएलसारख्या कंपन्यांनी जुने दरच कायम ठेवण्यासंबंधी राज्य कृषी खात्यांना पत्र पाठविले आहे. देशात सर्व प्रकारच्या खतांचा मुबलक साठा आहे. खरीप हंगामात खताची कमतरता भासणार नाही याकरिता दक्षता घेण्यात येईल. त्यासाठी आतापासूनच पूर्वतयारी केली जात आहे, असे केंद्रीयमंत्री सदानंदगौडा यांनी सांगितले.
नवी दिल्ली येथे मंगळवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकऱयांविषयी केंद्र सरकारला असणाऱया आत्मियतेबद्दल कोणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. शेतकऱयांना शक्य तितक्या कमी किमतीत खतपुरवठा करण्यास केंद्र सरकार कटिबद्ध आहे. खतावरील सबसिडीसाठी केंद्र सरकार मोठय़ा प्रमाणात खर्च करत आहे. 2019-20 या वर्षात खताच्या सबसिडीसाठी 83,467 कोटी रुपये देण्यात आले होते. मागील वर्षीही कोरोना परिस्थिती असताना 1,31,229 कोटी रुपये खताच्या सबसिडीसाठी देण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी दिली.
कुमारस्वामींना टोमणा
खतांच्या किमतीत वाढ आणि सबसिडीवरून केंद्र सरकारवर माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केलेले ट्विट बालिश असल्याची प्रतिक्रिया सदानंदगौडा यांनी दिली आहे. माजी पंतप्रधानांचा मुलगा असून देखील कुमारस्वामींना देशाच्या रासायनिक खातांच्या किमती आणि पुरवठा व्यवस्थेविषयी प्राथमिक ज्ञान नसणे खेदाची बाब आहे. त्यांना याविषयी माहिती हवी असेल तर आपल्याला विचारावी, असा टोमणा सदानंदगौडा यांनी कुमारस्वामींना हाणला आहे.