कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांचे आवाहन
प्रतिनिधी / पणजी
समाजातील दुर्बल घटकांना व या पुर्वीच्या पिढीला अनेक त्रास सहन करावे लागले. संविधानाने आपल्याला आपले अधिकार दिले आहेत. परंतू समाजातील लोक आजही शंका कुशंकांना जागा देऊन स्वतःवरच अन्याय करून घेत आहेत. त्यासाठी संविधानाने आपल्याला दिलेले अधिकार समजून घेणे गरजेचे आहे, असे मत कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी व्यक्त केले.
युगनायक गोवा संस्थेतर्फे कला व संस्कृती संचालनालय व इन्स्टिटय़?ट मिनेझिस ब्रागांझाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी ब्रागांझा सभागृहात 130वा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने मंत्री गावडे बोलत होते. व्यासपीठावर नाटय़कला महाविद्यालयाचे प्राचार्य रामराव वाघ, क्रिडा संचालनालयाचे सहाय्यक संचालक डॉ. विवेक पवार, ब्रागांझा संस्थेचे सदस्य सचिव दिगंबर काणकोणकर, युगनायक चे अध्यक्ष सुधाकर पेडणेकर व ओमकार गोवेकर उपस्थित होते.
मंत्री गावडे म्हणाले, की डॉ. आंबेडकर चालते बोलते ज्ञानपीठ होते. हुशार व विचारवंत व्यक्तीमत्व. तरूणांच्या नसानसात त्यांनी विचार करण्याची वृत्ती वाढविली. देशाला त्यांनी मौलिक असे संविधान दिले. जो पायाने चालतो, तो अंतर पार करतो, पण जो विचारांनी चालतो तो ध्येयापर्यंत पोचतो, हे विचार आंबेडकांनी समाजात रुजविले. पुस्तकाने मस्तक सुधारते व मस्तक सुधारले की कुठेही नतमस्तक व्हावे लागत नाही. अपयशाविना यश पदरी पडत नाही, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले. कार्यक्रमात पेडणेकर यांनी प्रास्ताविक केले. युगनायक तर्फे त्यांनी समाजाच्या उन्नत्तीसाठी सरकारकडून आर्थिक सहाय्याची मागणी केली.