ऑनलाईन टीम / मुंबई :
नाशिकमधील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेनंतर आज विरार येथील कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, सरकारला एक महत्त्वाचा सल्लाही दिला आहे.
विरारमधील आगीच्या दुर्घटनेवर राज ठाकरे यांनी ट्वीट केले आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, आज विरारमधील हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला, परवा नाशिक मधली घटना असो की काही दिवसांपूर्वीची भंडारा आणि भांडुप मधील घटना असोत. ह्या घटना दुर्दैवी आणि क्लेशदायी आहेत. सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य, पण म्हणून ह्या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही,’ अशी उद्विग्नता राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
पुढे ते म्हणाले, सरकारने तातडीने जबाबदार अधिकाऱ्यांच्या टीम्स तयार करून, प्रत्येक रुग्णालयातील व्यवस्थांचे, अग्निसुरक्षा यंत्रणांचे तात्काळ ऑडिट करून घ्यायला हवे. आणि ज्या त्रुटी आढळतील त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला आहे.
दरम्यान, विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी या आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.