प्रतिनिधी/ सातारा
शहरात वाढलेल्या कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी पालिका प्रशासन आणि पोलिसांनी जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार कामाला प्रारंभ केलेला आहे. शहरातील सर्व प्रवेशद्वारे बॅरिकेट्स लावून बंद करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी काम करत होते. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्यासह पोलिसांनी पाहणी केली. दरम्यान, विनाकारण फिरणाऱयांना चकाटय़ा माराव्या लागणार आहेत. पोलीस त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहे. शहरातील तीनही भाजी मंडया पालिकेने शुक्रवारी बंद केल्या असून घरोघरी भाजी पुरवठा करण्यासाठी फेरीवाल्याना दोन दिवसांत परवाने देण्यात येणार आहेत.
सातारा शहरात कोरोनाचा विस्फोट सुरु आहे. कडक लॉकडाऊनच्या अनुषंगाने सातारा जिल्हाधिकाऱयांनी दिलेल्या आदेशानुसार पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे, अभियंता दिलीप चिद्रे, अतिक्रमण हटावचे प्रशांत निकम यांनी शुक्रवारी सकाळी पाहणी केली. नागरिकांची वर्दळ कशी होते याचा त्यांनी सर्व्हे केला. बाहेरुन नागरिक कसे येतात. याची चाचपणी करुन पालिकेच्या बांधकाम विभागाच्या कर्मचाऱयांना बॅरिकेट्स लावण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शहरात येणारे सर्व रस्ते बांबू लावून सील करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामध्ये मेढय़ाकडून येणाऱया मोळाचा ओढा, लोणंदकडून येणारा वाढेफाटा चौकात, रहिमतपूरकडून येणाऱया अंजठा चौकात, कोरेगावकडून येणाऱया बॉम्बे रेस्टॉरंट चौकात, कराडकडून येणाऱया शिवराज चौकात व बोगद्याकडून येणाऱया समर्थ मंदिर परिसरात बॅरिकेट्स लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
शहरातील रस्तेही केले बंद
पोलिसांचा बंदोबस्त असला तरीही नागरिक बिनधास्तपणे फिरताना दिसतात. त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे आता अशा मोकाट फिरणाऱया नागरिकांना कोर्टाच्या चकाटय़ा माराव्या लागणार आहेत. दरम्यान, कोरोनाच्या अनुषंगाने शहरातील अंतर्गत रस्तेही बंद करण्याचे काम पालिकेने हाती घेतले होते. त्यामध्ये सेव्हनस्टारच्या समोरील राधिका रस्ता, सेव्हनस्टारकडे जाणारा रस्ता, देवी चौकातील रस्ता, पाचशे एक पाटीजवळच्या चौकात, सवेरा बार चौक, शाहु चौक, विठोबाचा नळ या चौकात बॅरिकेटस लावण्यात आली आहेत.
शहरातील तीनही मंडई झाल्या बंद
युनियन भाजी मंडईतील काही भाजी विक्रेत्यांना कोरोनाची बाधा झाली तरीही काही भाजी विक्रेते हे खुलेआमपणे रस्त्यावर भाजी विक्री करताना दिसतात. कोरोनाच्या अनुषंगाने कोणीही नियम पाळत नसल्याचे निदर्शनास आल्याने शहरातील सर्वच तीनही भाजी मंडई बंद ठेवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामध्ये युनियन भाजी मंडई, महात्मा फुले भाजी मंडई, रविवार पेठेतील समर्थ भाजी मंडई पालिकेने बंद केलेली आहे. तसेच सातारा शेती उत्पन्न बाजार समितीच्या समोरील मंडई अशा सर्वच मंडई पालिका प्रशासनाने बंद ठेवण्याचा निर्णय घेत दोन दिवसांमध्ये घरोघरी भाजी विक्री करणाऱयांना परवाने दिले जाणार आहेत, अशी माहिती पालिकेतून देण्यात आली.
मुख्याधिकारी अभिजीत बापट ऑन द फिल्ड
सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट हे प्रशासनातील बाप माणूस म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे जिह्याचा प्रशासन अधिकारी म्हणून कार्यभार आहे. त्यांनी शहरातील कोरोनाला ब्रेक लावण्यासाठी विशेष लक्ष घातले आहे. आज त्यांनी पाहणी करुन पालिकेच्या कर्मचाऱयांना सूचना दिल्या. बापट साहेब ऑन द फिल्ड असून त्यांनी घेतलेले निर्णय हितावह ठरणार आहेत.