भाजप अन् फॉरवर्ड ब्लॉककडून जोरदार प्रचार
वीरभूम जिल्हय़ातील महत्त्वपूर्ण नलहाटी मतदारसंघात यंदाही अत्यंत चुरशीची लढत आहे. सध्या या मतदारसंघावर तृणमूल काँग्रेसचा कब्जा आहे, पण सत्तारुढ पक्षावर मात करण्यासाठी भाजप अन् फॉरवर्ड ब्लॉक जोरदार प्रयत्न करत आहेत. या मतदारसंघात आठव्या आणि अखेरच्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी मतदान असून यंदा येथे त्रिकाणी लढत दिसून येत आहे. 2016 च्या निवडणुकीत तृणमूलचे मोइनुद्दीन शम्स यांनी फॉरवर्ड ब्लॉकच्या दीपक चटर्जी यांना 10,328 मतांनी पराभूत केले होते. तृणमूलने यंदा विद्यमान आमदार मोइनुद्दीन यांच्याजागी राजेंद्रप्रसाद सिंग यांना उमेदवारी दिली आहे.
तर भाजपकडून तापस कुमार यादव तर संयुक्त मोर्चाकडून फॉरवर्ड ब्लॉकचे दीपक चटर्जी मैदानात आहेत. दीपक चटर्जी यांनी 2006 च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार अब्दुल वालिद मुल्ला यांना पराभूत केले होते. चटर्जी चौथ्यांदा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर भाजपनेही या मतदारसंघात विजयी होण्यासाठी पूर्ण जोर लावला आहे. भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्र्यांनीही पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ प्रचारसभा घेतल्या आहेत. तर फॉरवर्ड ब्लॉकचा उमेदवार मतदारसंघात चांगली प्रतिमा बाळगून आहे. याचमुळे या मतदारसंघात यंदा तृणमूलसाठी विजयाची वाट सोपी राहिलेली नाही.
फॉरवर्ड ब्लॉकचा दबदबा
आकडेवारीवर नजर टाकल्यास या मतदारसंघात फॉरवर्ड ब्लॉकचा दबदबा राहिला आहे. 1997 ते 2011 पर्यंत या मतदारसंघात 7 वेळा फॉरवर्ड ब्लॉक तर एकदा काँग्रेस विजयी झाला आहे. 2011 मध्ये या मतदारसंघातून माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांचे पुत्र आणि काँग्रेस नेते अभिजीत यांनी विजय मिळविला होता. त्यांनी फॉरवर्ड ब्लॉकच्या दीपक चटर्जी यांना पराभूत केले होते.
तिन्ही पक्षांकडून विजयाचा दावा
तिन्ही राजकीय पक्ष तृणमूल काँग्रेस, भाजप आणि फॉरवर्ड ब्लॉकचे उमेदवार या मतदारसंघात स्वतःच्या विजयाचा दावा करत आहेत. मागील 10 वर्षांमध्ये तृणमूलच्या सरकारने राज्यात मोठा विकास घडवून आणला आहे. येथील जनता तृणमूल सरकारच्या कामकाजाबाबत समाधानी असल्याचा दावा तृणमूलचे उमेदवार राजेंद्र प्रसाद सिंग यांनी केला आहे. तर निवडणुकीच्या मैदानात लढाई चुरशीची असली तरीही विजय एकाचाच होणार आहे. आमचा पक्ष विजयासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. विजयाची माळ कुणाच्या गळय़ात घालणार याचा निर्णय मतदार घेणार असल्याचे उद्गार फॉरवर्ड ब्लॉकचे उमेदवार दीपक चटर्जी यांनी काढले आहेत. तृणमूलच्या शासनकाळात वीरभूमध्ये विशेषकरून नलहाटी भागात अशांतता राहिली आहे. या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भाजपचा विजय आवश्यक आहे, तरच येथे विकास होऊ शकेल असा दावा भाजप उमेदवार तापस कुमार यादव यांनी केला आहे.