बंगाल राज्यातील आठव्या टप्प्याचे मतदान पार पडताच एबीपी सी- व्होटर, ईटीजी रिसर्च, सीएनएन न्यूज एटीन, रिपब्लिक सीएनएक्स, टाईम्स नाऊ या सर्व संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर सर्वेक्षणाचा निष्कर्ष जाहीर झाला. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला तर आसाममध्ये एनडीएला सत्ता मिळेल, केरळमध्ये डाव्या पक्षांची सत्ता येईल असा अंदाज या सर्व चाचण्यांद्वारे व्यक्त झाला आहे. आसाम आणि केरळबाबतीत काँग्रेसचा हिरमोड होणार असे हे अंदाज सांगत आहेत. बंगालमध्ये रिपब्लिक चॅनल वगळता इतर सर्वांना ममता यांची सत्ता येईल असे वाटते तर रिपब्लिकला काठावर का होईना भाजपला बहुमत मिळेल असे वाटते. पाच राज्यांसाठी देशातील 20 टक्के लोकसंख्या आपले भवितव्य आणि राज्यकर्ते ठरवणार होती. त्यांच्यात अनेक वादग्रस्त मुद्देही चर्चेत होते. विशेष म्हणजे ही सर्व राज्ये गैरहिंदी म्हणून प्रसिद्ध आहेत. तामिळनाडूमध्ये जयललिता आणि के. करुणानिधी यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने तिथला मतदार काय विचार करेल याबाबत उत्सुकता होती. चाचण्यांचा अंदाज तेथे विरोधी पक्ष असणाऱया एम.के. स्टालिन यांच्या नेतृत्वाखालील द्रमुकला जनतेने पसंती दिल्याचे सांगतो आहे. जयललिता यांच्या उत्तराधिकाऱयांची पिछेहाट होत आहे. पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात भाजप आपले वर्चस्व राखेल. आसाममध्ये काँग्रेसला मोठी आशा वाटत होती. मात्र तेथे भाजप आघाडी सत्ता मिळवेल. एकूणच निकालाच्या दोन दिवस आधी हे सर्व अंदाज जाहीर झाल्याने उत्सुकता वाढली आहे. कोरोनाचा आकडा एकीकडे उच्चांकाला पोहोचला असताना आणि न्यायालयाने निवडणूक आयोगाला त्यासाठी जबाबदार धरलेले असतानाही शेवटच्या टप्प्यात बंगालमध्ये 76 टक्के इतके मतदान झाले आहे. या मतपेटीतून काय निकाल बाहेर येतो ते उद्या समजणारच आहे. भाजपला बंगालमध्ये हात-पाय पसरायचे होते. त्यासाठी त्यांनी प्रचाराचे स्वतःचे एक तंत्र निर्माण केले. ते वर्षानुवर्षे एकाच राज्यकर्त्याला मतदान करणाऱया बंगालमध्येही यशस्वी झाले आहे असेच म्हणता येईल. पारंपरिक विरोधक असणाऱया डाव्यांना बाजूला सारत भाजपने तेथे आपली जागा निर्माण केली आहे. डाव्यांचा गड उद्ध्वस्त करत काँग्रेस विचार ताब्यात ठेवत ममता यांनी इतिहास रचला होता. मात्र त्यापूर्वी काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला आव्हान देत भाजपशी हातमिळवणी करत त्यांनी वाजपेयी सरकारात स्वतःचे स्थान निर्माण केले. नंतर बंगालमध्ये डाव्यांना आव्हान देत त्यांचा गड काढून घेतला. गेल्या दशकभरात बंगालवर ममता यांची जादू पसरली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सर्वसामान्यांच्या मनात त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीत मोदी उदयानंतर अनेक राज्यातील प्रादेशिक पक्षांना भाजप मोठे आव्हान ठरलेले आहे. परिणामी एक किंवा दोन प्रादेशिक पक्षांची शक्ती कमी करून, त्यांच्या प्रभावी नेत्यांना पक्षात घेऊन आपले आव्हान निर्माण करण्याचे काम भाजपने केले आहे. त्याला निवडणूक तंत्राची जोड देत सूक्ष्म नियोजन करत अमित शहा आणि नरेंद्र मोदी या जोडीने देशातील अनेक राज्ये पादाक्रांत केली आहेत. जिथे ते सपशेल अपयशी ठरले तिथे मोडतोडीचे राजकारण करून सत्ता मिळवण्यातही ते काही ठिकाणी यशस्वी झाले. मात्र दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, बंगाल अशा काही ठिकाणी त्यांची डाळ अद्याप शिजली नाही याची सल या जोडीला नक्कीच आहे. बंगालमध्ये शक्ती आजमावण्याची संधी त्यांनी दोन लोकसभा निवडणुकांमध्ये साधली आहे. पहिल्या मोदी लाटेत मिळालेल्या यशाच्या जीवावर दोन वर्षांपूर्वी त्यांनी बंगालमध्ये लोकसभेला घवघवीत यश संपादित केले आणि त्यामुळे त्यांचा उत्साह दुणावला. त्याचवेळी तृणमूल पक्षांतर्गत कुरघोडी, केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाने अनेक प्रकरणांची घडलेली चर्चा, चिट फंड घोटाळय़ाचे आरोप या आणि अशाच बारीकसारीक प्रकरणांचा गाजावाजा करत भाजपने आपली हवा निर्माण करण्यात यश मिळवले. निवडणुकीत साधनांची प्रचंड रेलचेल असणाऱया या पक्षाने आपली सगळी शक्ती या राज्यात लावली होती. खुद्द पंतप्रधानांचे दौऱयावर दौरे, बंगाली मतदारांना आकर्षित करण्यासाठी तिथल्या मान्यवरांना भारतरत्न देण्यापासून ते थेट रवींद्रनाथ टागोर यांच्यासारखी दाढी वाढवण्यापर्यंत मोदींनी सर्व काही करून पाहिले. नानाजी देशमुख यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने कदाचित ते नानाजींच्या स्मृती जागृत करत असावेत असेही अनेकांना वाटले. पण शांतिनिकेतनमध्ये ते जेव्हा पोहोचले तेव्हा लोकांना पूर्ण उलगडा झाला. एकीकडे तामिळनाडूमध्ये जयललितांच्या पक्षाची लोकप्रियता हाताळून आपल्या पक्षाला चंचुप्रवेश मिळवण्याचा आणि आपले उमेदवार म्हणजे ‘अम्मांचेच’ उमेदवार आहेत असे भासवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. रजनीकांत यांना आपल्या राजकारणाशी जोडण्याचा ही त्यांचा प्रयत्न होता मात्र तो यशस्वी झाला नाही. आसाममध्ये स्थानिक पक्षाशी युती करताना भविष्यात हे पक्ष टिकणार नाहीत याची तजवीज आतापासूनच केल्याचे दिसून आले आहे. केरळमध्ये त्यांना म्हणावे तसे यश मिळेल असे चाचण्यांच्या निष्कर्षातून तरी वाटत नाही. त्यामुळे बंगालमधील त्यांच्या यशावरच भाजपची सर्वात मोठी भिस्त आहे. येथे सत्ता मिळते का नाही याच्या पेक्षाही पदार्पणातच त्यांना मिळणारे यशही मोठे असणार आहे. त्यामानाने इथली काँग्रेस आणि डाव्यांचे काय होणार आणि बंगाली जनतेच्या नजरेत त्यांचे किती महत्त्व उरले आहे हे सुद्धा ही निवडणूक ठरवणार आहे. बहुतांश सत्ताधाऱयांच्या बाजूने आलेला हा कौल काहीअंशी वेगळेपण दाखवणारा आणि उद्याच्या राजकारणाची दिशा दर्शवणाराही आहे. प्रत्यक्ष निकालानंतर यात अधिक स्पष्टता येईल. मात्र जे अंदाज व्यक्त झाले आहेत त्यावरून भविष्यातील राजकारणात प्रादेशिक पक्षांना ठाम भूमिका घेऊन आपापला भाग वाचवायचा की तात्कालिक फायदा बघत राष्ट्रीय भूमिकेच्या मागे लागून स्वतःवर संकट ओढवून घ्यायचे याचा विचार सर्वच नेत्यांना करणे भाग पडेल हे मात्र निश्चित.
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.