वेळीच सरकार जागे झाले असते तर बिघडली नसती स्थिती
वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
आरबीआयचे माजी गव्हर्नर आणि मोदी सरकारच्या धोरणांचे टीकाकार राहिलेले रघुराम राजन यांनी भारतातील कोरोनाच्या विक्राळ संकटासाठी नेतृत्वाला जबाबदार ठरविले आहे. मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर देशात निर्माण झालेल्या आत्ममग्नतेची फळं भारत भोगत असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत. भारतात मागील काही दिवसांपासून प्रतिदिन 3.5 लाखांहून अधिक नवे कोरोनाबाधित सापडत आहेत. संक्रमण रोखण्यासाठी कठोर लॉकडाऊन लागू करण्याकरता सरकारवर दबाव आहे, पण सरकारने आतापर्यंत याला नकार दिला आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्य अर्थतज्ञ राहिलेल्या राजन यांनी एका मुलाखतीत भूमिका मांडली आहे. जर तुम्ही सावध असता तर कोरोनाचा धोका संपलेला नसल्याचे समजले असते. जगात अन्यत्र विशेषकरून ब्राझीलमध्ये जे घडत आहे, ते पाहून विषाणू परतत आहे आणि पूर्वीपेक्षा अधिक धोकादायक होत असल्याचे कळले असते. मागील वर्षी कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्यावर विषाणूचे संकट संपल्याचे वाटून भारताने सर्व निर्बंध हटविले. हीच आत्ममग्नता आज भारताला मारक ठरत असल्याचे राजन म्हणाले.
लसीकरणाकडे दुर्लक्ष
कोरोनाच्या पहिल्या लाटेला रोखण्याच्या भारताच्या यशामुळेच त्याने स्वतःच्या लोकांसाठी पुरेशा लसी निर्माण करण्यावर लक्ष दिले नाही. अद्याप आपल्याकडे वेळ असल्याचे भारताला वाटले असावे. आम्ही विषाणूवर मात केली असल्याने लसीकरणाकरिता घाई करायला नको अशी समजूत भारताची झाली असावी. पण आता सरकार जागं झालं असून ते आपत्कालीन स्वरुपात काम करत असल्याचे विधान त्यांनी केले आहे.
आरबीआयचे माजी गव्हर्नर
रघुराम राजन हे 2013 साली रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर झाले होते. पण ते मोदी सरकारच्या धोरणांचे टीकाकार राहिले आहेत. आरबीआय लाभांश आणि व्याजदरांच्या मुद्दय़ांवर त्यांचे मोदी सरकारसोबत खटके उडाले होते.