जास्तीत जास्त लस पुरवठय़ासाठी सत्ताधारी, पालकमंत्र्यांकडून तात्काळ कार्यवाहीची अपेक्षा
प्रतिनिधी / कणकवली:
गेल्या महिनाभरात सिंधुदुर्गमध्ये कोरोनाने गंभीर होणाऱया तसेच मृत्यू होणाऱया रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत आहे. सिंधुदुर्गचा मृत्यू दर राज्यात ‘टॉप’वर आहे. मात्र, यावर प्रभावी पर्याय ठरत असलेल्या लसीकरणाबाबत तेवढेसे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. वाढत्या मृत्यू दराच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ासाठी सत्ताधारी, पालकमंत्र्यांनी ‘वजन’ वापरून लसीचे जादा डोस उपलब्ध करण्याची गरज असतानाही तसे होताना दिसत नाही. परिणामी जिल्हय़ातील ज्येष्ठांसह सर्वांनाच लसीकरणाच्या प्रतीक्षेत राहण्याची वेळ आली आहे. यातील अनेकांच्या दुसऱया डोसचा किमान कालावधी उलटून गेला असल्याने लसीची प्रतीक्षा संपणार कधी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ऑनलाईन नोंदणीनुसार पाहिल्यास सिंधुदुर्गमध्ये आतापर्यंत 1 लाख 24 हजार 629 जणांचे लसीकरण झाले आहे. यात 1 लाख 951 जणांना पहिला डोस, तर 23 हजार 678 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. यापैकी 27 हजार 60 जणांना कोव्हॅक्सीन व 97 हजार 569 जणांना कोविशिल्डचा डोस देण्यात आल्याचे दिसून येते.
किमान कालावधी वाढल्यास हरकत नाही!
पहिला डोस संपून दुसरा डोस घेण्यासाठी कोव्हॅक्सीनसाठी 28 दिवसांनंतर, तर कोविशील्डसाठी 45 दिवसांनी घेण्याबाबत पहिल्या टप्प्यात सांगण्यात आले होते. त्यानंतर हा कालावधी किमानसाठी आहे. त्यात वाढ झाली, तरी कोणतीही समस्या नाही. किमान कालावधीनंतर दुसऱया डोससाठी उशीर झाला, तरीही घाबरण्याची गरज नाही. काही दिवस उलटले, तर प्रतिकारशक्ती वाढविण्याच्यादृष्टीने ते चांगले असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
तातडीने पुरेशी लस द्या- प्रभाकर सावंत
जिल्हय़ातील लसीकरणाच्या अल्प साठय़ाबाबत भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत म्हणाले, कोव्हॅक्सीन आणि कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्याचा निर्धारित कालावधी उलटून गेला, तरीही लस मिळत नाही. डोस घेण्यासाठी सेंटरवर गेलेल्यांना राज्य सरकारकडून पाठविलेला डोस आहे. केंद्राचा डोस आल्यानंतर पहिला डोस दिलेल्यांना दुसरा डोस देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. याबाबत सत्ताधारी व यंत्रणेलाही गांभीर्य असल्याचे दिसत नाही. याप्रकरणी आपण आमदार नीतेश राणे यांच्याशी संपर्क साधून कल्पना दिल्यानंतर त्यांनी आरोग्य उपसचिवांना सांगून लसीचा पुरवठा तातडीने करण्यासोबतच दुसरा डोस देय झालेल्यांना तातडीने लस देण्याची मागणी केली आहे. त्यांनीही लवकरात लवकर डोस देण्याचे आश्वासन दिल्याचे सावंत म्हणाले. जिल्हय़ासाठी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून जास्तीत जास्त लसीकरण लवकरात लवकर करून कोरोनावर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचेही सावंत म्हणाले.
इतर आजार असलेल्यांना प्राधान्य द्या!
सिंधुदुर्गचा आजचा मृत्यू दर राज्यात सर्वाधिक असूनही जिल्हय़ाला पुरवठा होणाऱया लसीचे प्रमाण कमी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही जिल्हय़ांसाठी झालेल्या लस पुरवठय़ात सिंधुदुर्गला लस पुरवठा कमी झाल्याचे दिसते. सिंधुदुर्गमधील कोरोनाबाधीत रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण व त्यात डायबेटीस, उच्चरक्तदाब वा इतर आजार असलेल्यांच्या मृत्यूची टक्केवारी याचा विचार करता, जिल्हय़ासाठी अशांना लस प्राधान्याने देण्याचे सूक्ष्म नियोजन करण्याची गरज आहे. ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ अंतर्गत असे आजार असलेल्यांचा डाटा आरोग्य विभागाकडे उपलब्ध आहे. एकीकडे 18 ते 44 वयोगटासाठी ऑनलाईन नोंदणीने लसीकरण होत असताना दुसरीकडे 45 वर्षांवरील वा ज्येष्ठांच्या या डाटानुसार नियोजन करून तसेच दुसऱया डोसची मुदत संपलेल्यांना प्राधान्य देत लस देण्याची प्रक्रिया राबविण्याची गरज आहे. यासाठी पालकमंत्री, आमदार, खासदार यांनी प्रयत्न करून जिल्हय़ासाठी जास्तीत जास्त लस कशी उपलब्ध होईल, यासाठी ताकद वापरण्याची गरज आहे.