पाकिस्तानी दूतावासांना चांगलेच सुनावले
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचा दाखला देत विदेशातील पाकिस्तानी दूतावासांना चांगलेच सुनावले आहे. वसाहतकालीन मानसिकता सोडून पाकिस्तानी वंशीय लोकांसोबत पूर्ण संवेदनेने वागा, असे इम्रान यांनी राजदूतांना बजावले आहे. जगभरातील भारतीय दूतावास विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अत्यंत सक्रीय असल्याचे उद्गार इम्रान यांनी काढले आहेत.
जगभरात फैलावलेल्या पाकिस्तानी दूतावासांना संबोधित करताना इम्रान यांनी विदेशात स्थायिक पाकिस्तानींसोबत गैरवर्तन आणि देशात विदेशी गुंतवणूक आणण्यास अपयशी ठरल्याप्रकरणी फटकारले आहे. दूतावासांचे सर्वात महत्त्वाचे काम विदेशातील पाकिस्तानींची सेवा करणे आहे. देश आर्थिक संकटाला तोंड देत असल्याने दूतावासांनी गुंतवणूक आणण्यासाठी काम करावे. पाकिस्तानच्या तुलनेत भारतीय दूतावास स्वतःच्या देशात विदेशी गुंतवणूक आणण्यासाठी अधिक सक्रीय असल्याचे इम्रान यांनी म्हटले आहे.
सौदी अरेबियाच्या रियाधमध्ये पाकिस्तानी लोकांसोबतच्या गैरवर्तनाच्या तक्रारीनंतर स्वतःच्या दूतावासातील कर्मचाऱयांची चौकशी सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर इम्रान यांनी हे विधान केले आहे. पाकिस्तानी कामगारांच्या तक्रारीनंतर इम्रान सरकारने स्वतःचा राजदूत तसेच 6 अन्य अधिकाऱयांना माघारी बोलाविले आहे.