प्रतिनिधी / मुंबई, कोल्हापूर
मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्यानंतर राज्यातील मराठा समाजात प्रचंड खदखद, संताप आहे. संतफ्त मराठा समाज रस्त्यावर उतरू नये, सरकार विरोधात आंदोलन करू नये, यासाठी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात लॉकडाऊन वाढवत आहे, असा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. आरक्षणाच्या लढय़ात मराठा संघटना जे जे निर्णय घेतील, त्याला भाजपचा पाठिंबा असेल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या मराठा आरक्षण विषयक समितीची बैठक मंगळवारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी
राज्यातील महाविकास आघाडी सरकार मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरु नये म्हणून कडक लॉकडाऊन करत आहे. पण मराठा संघटना आरक्षणासाठी जे जे ठरवतील त्याला भाजपचा पाठिंबा असेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, खासदार रणजितसिंह नाईकöनिंबाळकर, आमदार प्रसाद लाड, नरेंद्र पाटील, श्रीकांत भारतीय, गिरीश महाजन, राणा जगजितसिंह पाटील, कोल्हापूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे उपस्थित होते.
बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून भूमिका मांडली. ते म्हणाले, फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले आणि ते हायकोर्टात टिकले सुद्धा. मात्र महाविकास आघाडी सरकारने भक्कम बाजू न मांडल्याने सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द झाले. भविष्यात आरक्षण लढय़ासाठी मराठा संघटनांच्या आंदोलनाला भाजप पाठींबा देणार, एक तज्ञ समिती नेमून कायदा कसा योग्य आहे वगैरे या गोष्टी दाखवून देऊ. नवा मागासवर्गीय आयोग हा सरकारलाच नेमावा लागेल. मराठा समाज हा मागास आहे हे सिद्ध करावे लागेल, मग हा अहवाल केंद्राला पाठवावा लागेल” असे पाटील म्हणाले.
मराठा संघटनांनी लॉकडाऊनमध्ये मोर्चे काढले तरीही पाठिंबा
मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज, संभाजी ब्रिगेड, शिवसंग्राम या संर्व संघटनांनी एकत्र येऊन आरक्षण मिळवायचे आहे. त्यासाठी या संघटना जे जे ठरवतील त्याला भाजपचा पाठिंबा असेल. लॉकडाऊच्या नावाखाली हे मोर्चे निघू नयेत म्हणून राज्य सरकार प्रयत्न करत असेल तर त्या संघटना ठरवत असतील की आता बस्स झालं आता आम्ही लॉकडाऊनचे नियम पाळणार नाही. आम्ही मोर्चे काढणार या भूमिकेला भाजपचा पाठिंबा असेल असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
मराठा आरक्षणसाठी भाजपची कायदेतज्ञ समिती
मराठा आरक्षणाचा अभ्यास करण्यासाठी कायदेतज्ञांची समिती स्थापन करण्यावर या बैठकीत चर्चा झाली. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने सुनावणीवेळी काय चुका केल्या, सरकारच्या कोणकोणत्या चुकांमुळे मराठा आरक्षण रद्द झाले, याचा अभ्यास ही समिती करणार आहे. या समितीच्या निष्कर्षावरून भाजप सरकारची पोलखोल करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.