पावसाळय़ात पाणी घरात शिरण्याची नागरिकांना भीती : स्वच्छतेचे काम त्वरित करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
पावसाळय़ापूर्वी शहरातील नाल्यांची आणि गटारींची स्वच्छता करण्याची आवश्यकता होती. पण याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले आहे. परिणामी चौगुलेवाडी, गजानन महाराजनगर येथील नाला कचऱयाने बुजला असल्याने सांडपाणी साचून राहिले आहे. काही नाल्यांच्या स्वच्छतेचे काम रखडल्याने पावसाळय़ापूर्वी नाला स्वच्छतेचे काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
पावसाळय़ात नाल्यांचे पाणी साचून राहिल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. प्रत्येक पावसाळय़ात या समस्या कोणत्या ना कोणत्या परिसरात भेडसावत असतात. यामुळे नाल्यांच्या स्वच्छतेचे काम पावसाळय़ापूर्वी करण्याची मागणी होत असते. पण याकडे आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांकडून दुर्लक्ष झाले आहे. पावसाळा येऊन ठेपला तरी अद्याप नाला स्वच्छता मोहीम महापालिकेने हाती घेतली नाही.
बहुतांश नाल्यांमध्ये कचरा साचला असून काही ठिकाणी नाल्यांमध्ये झाडेझुडुपे वाढली आहेत. यामुळे पावसाळय़ात पाणी साचण्याची समस्या भेडसावणार का? असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने महापालिका प्रशासनाने नाला स्वच्छता मोहीम हाती घेतली नाही. त्यामुळे शहरातील नाले अद्याप स्वच्छ केले नाहीत. पण नाला स्वच्छता मोहीम राबविली नसल्यास पावसाळय़ात अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
गजानन महाराजनगर व चौगुलेवाडी नाल्यांमध्ये कचऱयामुळे सांडपाणी साचून आहे. कचऱयामुळे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. व्हॅक्सिन डेपो, मंडोळी रोड अशा विविध परिसरामधून सांडपाणी वाहते. यामुळे पावसाळय़ात नाल्याला मोठय़ा प्रमाणात पाणी असते. नाल्यामधील कचरा काढून स्वच्छ करणे आवश्यक आहे. पण याकडे आरोग्य विभागाच्या पर्यावरण अभियंत्यांनी कानाडोळा केला असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. नाल्यात सांडपाणी साचून राहत असल्याने परिसरात दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. दरवर्षी पावसाळय़ात गजानन महाराजनगर परिसरातील नाल्याला पूर येऊन घरांमध्ये पाणी शिरते. यामुळे पावसाळय़ात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
विविध परिसरातील नाल्यांची स्वच्छता करा : पंढरी परब
काही नाल्यांची स्वच्छता जेसीबीने तर काही नाल्यांची स्वच्छता कामगारांमार्फत केली जाते. पण यंदा नाला सफाई मोहीम अद्यापही राबविण्यात आली नाही. त्यामुळे गजानन महाराजनगरमधील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. टिळकवाडी परिसरातील नाल्यांसह चौगुलेवाडी, नानावाडी, गजानन महाराजनगर अशा विविध परिसरातील नाल्यांची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक पंढरी परब यांनी केली आहे.