सात टप्प्यांमध्ये काम सुरू : काम पूर्ण झाल्यास रेल्वे प्रवासाची गती वाढणार
प्रतिनिधी / बेळगाव
मिरज ते लोंढा या दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण केले जात आहे. लॉकडाऊनमुळे इतर कामे ठप्प असली तरी दुपदरीकरणाचे काम मात्र सुसाट वेगाने सुरू आहे. एकूण सात टप्प्यांमध्ये हे काम पूर्णत्वाकडे घेऊन गेले जात आहे. दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यास रेल्वे प्रवासाची गती वाढणार असून, प्रवाशांना सुखद प्रवास करता येणार आहे.
पुणे ते बेंगळूर या दरम्यानचा रेल्वे मार्ग दुपदरीकरण करण्याचा निर्णय केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने घेतला. त्यानंतर बेळगावचे माजी खासदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या प्रयत्नातून दुपदरीकरणाच्या कामाला वेग आला. पहिल्या टप्प्यात चिकोडी ते घटप्रभा या 16 कि. मी. दुपदरीकरणाचे काम डिसेंबर 2019 मध्ये पूर्ण करण्यात आले. दुसऱया व तिसऱया टप्प्यात चिकोडी रोड-रायबाग, रायबाग-चिंचली, चिंचली-कुडची अशा एकूण 31 कि. मी. रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले आहे.
चौथ्या टप्प्यात बेळगाव ते खानापूर या 25 कि. मी. तर लोंढा ते खानापूर या 25 कि. मी. रेल्वे रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात येत आहे. बेळगाव ते लोंढा हा रेल्वे मार्ग जंगल भागातून जात असल्याने अनेक अडथळे येत आहेत. लाल माती घालून ती व्यवस्थित बसल्यानंतरच खडीकरणाचे काम केले जात आहे. पाचव्या टप्प्यात बेळगाव-सुलधाळ या 30 कि. मी. रेल्वे मार्गाचे रुंदीकरण होणार आहे. सहाव्या टप्प्यात सुलधाळ ते घटप्रभा 30 कि. मी. तर सातव्या टप्प्यात मिरज ते कुडची या 33 कि. मी. रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण होणार आहे.
दुपदरीकरणासोबत विद्युतीकरणही
मिरज ते लोंढा या दरम्यान दुपदरीकरणासोबतच विद्युतीकरणाचे काम केले जात आहे. विद्युतीकरण केल्यानंतर रेल्वेची गती अजून वाढणार आहे. रेल्वेचा इंधन खर्चही कमी होणार आहे. यासाठी रेल्वेमार्गाच्या दुतर्फा खांब उभे करून विद्युत वाहिन्या ओढल्या जात आहेत. पुढील दोन वर्षांत विद्युतीकरणाचे कामही पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
2023 पर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न
घटप्रभा ते कुडची दरम्यानच्या 46 कि. मी. रेल्वे दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. लोंढा ते सुलधाळ हे 2022 पर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे. परंतु कोरोनामुळे कामगारांची संख्या घटल्याने त्याचाही परिणाम कामावर होत आहे. तर उर्वरित काम 2023 पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.
– अनिष हेगडे (जनसंपर्क अधिकारी-नैर्त्रुत्य रेल्वे)