गेल्या एक आठवडय़ात ‘तौक्ते’ आणि ‘यास’ या दोन चक्रीवादळांनी अनुक्रमे पश्चिम आणि पूर्व सागरतटांवर हाहाकार माजविला आहे. त्यामुळे चक्रीवादळ या भीतीयुक्त विषयाच्या चर्चेला चालना मिळाली आहे. चक्रीवादळांचा अभ्यास करणाऱया एका संस्थेने गेल्या 50 वर्षातील चक्रीवादळे आणि त्यामुळे झालेल्या अपरिमित हानीचा सर्वेक्षण अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे.
या अहवालानुसार 1970 ते 2019 या 50 वर्षांच्या कालावधीत भारताला 117 मोठय़ा चक्रीवादळांशी संघर्ष करावा लागला आहे. याच 50 वर्षांत हवामानाशी संबंधित 7 हजार 63 भीषण दुर्घटना घडल्या आहेत. त्यांच्यात या 117 चक्रीवादळांचा प्रामुख्याने समावेश होतो. या सर्व दुर्घटनांमध्ये मिळून 1 लाख 41 हजार 308 लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. यापैकी 40 हजार 358 लोक या 117 चक्रीवादळांमध्ये मृत्युमुखी पडले असून उरलेले 65 हजार 130 लोक महापूर व इतर नैसर्गिक आपत्तींना बळी पडले आहेत. चक्रीवादळांमध्ये 1971 मध्ये ओडिशात आलेले चक्रीवादळ सर्वात भयानक होते. त्यात किमान दहा हजार लोकांचा मृत्यू झाला होता तर 1977 मध्ये बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘चिराला’ या वादळाने शेकडो लोकांचा प्राण घेतला होता. 1970 ते 80 या दहा वर्षांतच चक्रीवादळांमध्ये 20 हजाराहून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते. अलीकडच्या काळात चक्रीवादळाचे अनुमान अचूकरीत्या अगोदर काढता येत असल्याने जीवित आणि वित्तहानी कमी प्रमाणात होते, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.