राज्य शेतकरी संघटनेची सरकारकडे मागणी : लॉकडाऊन कालावधीत 1 लाख कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला असून शेतीमालाला योग्य दर आणि बाजारपेठ न उपलब्ध झाल्याने शेतकऱयांचे 1 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यासंबंधीचा अहवाल तयार करून कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेने नुकसान भरपाई देण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बडगलपूर नागेंद्र यांनी शुक्रवारी बेंगळूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन लॉकडाऊन कालावधीत कृषी क्षेत्राचे झालेल्या नुकसानीचा अहवाल मांडला. लॉकडाऊनमुळे शेतकऱयांच्या पिकांना अत्यंत कमी दर मिळत आहे. काही ठिकाणी बाजारपेठा पूर्णपणे बंद असल्याने शेतीमाल नष्ट होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शेतकरी संघटनेने जमा केलेल्या माहितीनुसार राज्यात शेतकऱयांना 1 लाख कोटी रुपयांचे फटका बसला आहे. म्हैसूर जिल्हय़ातच केळी, फुले, टोमॅटो, भात आणि भाजीपाला उत्पादकांना 1,600 कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. विविध जिल्हय़ांमध्ये देखील फळे, भाजीपाला, हळद, आले आदी पिके घेणाऱऱयांनाही बाजारपेठ उपलब्ध नसल्याने आर्थिक फटका बसला आहे, अशी माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भात पीक घेण्यात येणाऱया जिल्हय़ांमध्ये सरकारने खरेदी केंद्रे सुरू करून आधारभूत दराने त्याची खरेदी करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. यापूर्वी खरेदी केंद्रांमधून खरेदी झालेल्या भात, नाचणा, जोंधळा या उत्पादनांची रक्कम शेतकऱयांच्या बँक खात्यात जमा करावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
सरकारने दूध खरेदी थांबवू नये. लॉकडाऊन कालावधीत दूधविक्री कमी झाली आहे, असे कारण पुढे करून सरकारने दूध खरेदी थांबविण्याचा विचार कर्नाटक मिल्क फेडरेशन (केएमएफ) करीत आहे. ही बाब योग्य नाही, असेही शेतकरी संघटनेचे म्हणणे आहे.
विशेष पॅकेज घोषित करा!
लॉकडाऊनमुळे शेतीमाल अत्यंत कमी दराने विक्री करण्याची अनिवार्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध न झाल्याने शेतकरी उत्पादने रस्त्यावर फेकून देत आहेत. कारण मालवाहतूक करण्याचा आणि मजुरांना वेतन देण्याचा खर्चही निघत नाही. त्यामुळे सरकारने विशेष पॅकेज घोषित करावे.
– बडगलपूर नागेंद्र, अध्यक्ष राज्य शेतकरी संघटना