पी.एन.पाटील यांच्यासोबतच्या बैठकीबाबत पालकमंत्र्यांचा निर्वाळा
कोल्हापूर / कृष्णात चौगले
गोकुळ दुध संघाच्या राजकारणातून पालकमंत्री सतेज पाटील व आमदार पी.एन.पाटील या दोन नेत्यांमध्ये कमालीचे मतभेद निर्माण झाले. अर्थिक सत्ताकेंद्राच्या लढाईतून त्यांच्यामध्ये मोठी दरी निर्माण झाली. त्यामुळेच काँग्रेसमध्ये सतेज पाटील व पी.एन.पाटील गट पडणार असे चित्र निर्माण झाले होते. पण रविवारी मोदी सरकारविरोधातील निदर्शनानंतर पालकमंत्री पाटील, आमदार पी.एन.पाटील यांच्यासह अन्य प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. हे दोन नेते पुन्हा एकत्र दिसल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी पालकमंत्री पाटील यांना ‘एकत्र आलात काय ?’ असा खोचक प्रश्न विचारला. यावेळी ‘गोकुळ’च झालं, आता काँग्रेस म्हणून आम्ही एकत्रच असल्याचा निर्वाळा पालकमंत्री पाटील यांनी दिला.
गोकुळच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीकडून आमदार पी.एन.पाटील यांनी नेतृत्व केले. तर पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे विरोधी आघाडीची धुरा होती. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून पालकमंत्री पाटील व पी.एन. यांच्यामध्ये वैचारीक मतभेद निर्माण झाले. परिणामी भविष्यातील राजकारणात काँग्रेसमध्ये सतेज पाटील व पी.एन. असे दोन गट दिसतील असे राजकीय आडाखे बांधले जात होते. तसेच आगामी जिल्हा परिषद व विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये फूट पडेल आणि त्याचा इतर पक्षातील उमेदवारांना फायदा होईल, असेही अंदाज बांधले जात होते. पण रविवारी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाबाहेर मोदी सरकारविरोधात केलेल्या आंदोलनामध्ये पालकमंत्री तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष आमदार पी.एन.पाटील हे देखील आवर्जून उपस्थित राहिले होते. या आंदोलनाची पत्रकार बैठकीत माहिती सांगितल्यानंतर पालकमंत्री पाटील, पी.एन.पाटील यांच्यासह अन्य प्रमुख कार्यकर्त्यांची काँग्रेस कमिटी कार्यालयात सुमारे पाऊण तास बैठक झाली. ‘गोकुळ’च्या लढाईतील आरोप प्रत्यारोपानंतरही या बैठकीत पी.एन.पाटील यांची उपस्थितीती पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या.
राजकीय आडाख्यांना तडे
या बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींनी पालकमंत्री पाटील यांना पी.एन.यांच्या उपस्थितीबाबत प्रश्न उपस्थित केला. यावेळी हा विषय हलका, फुलका घेत पालकमंत्री पाटील यांनी आता ‘गोकुळ’चं राजकारण संपलं, काँग्रेस म्हणून आगामी जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पी.एन. व आम्ही एकत्रच आहोत अशी स्पष्टोक्ती केली. त्यामुळे गोकुळ निवडणुकीनंतर अनेक राजकीय तज्ञांनी बांधलेल्या आडाख्यांना रविवारी तडा गेला. पालकमंत्र्यांच्या उत्तरानंतर मात्र उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या चेहऱयावर मात्र हास्य उमटले.
जिल्हा परिषद, विधानसभेच्या राजकारणात काँग्रेसची एकी अभेद्य
पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा आल्यानंतर गेल्या दोन वर्षांच्या काळात काँग्रेसला गतवैभव प्राफ्त झाले आहे. सर्वांना सोबत घेऊन बेरजेच्या राजकारणात पालकमंत्री पाटील पटाईत आहेत. त्यामुळे ‘गोकुळ’चे राजकारण विसरून पुन्हा ते जिल्हा परिषदेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे आगामी राजकारणात काँग्रेस पक्ष म्हणून एकत्र मिळूनच पी.एन.पाटील व आम्ही निवडणूका लढविणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ‘गोकुळ’च्या राजकारणातून काँग्रेसमधील विस्कटलेली घडी पुन्हा एकदा बसणार आहे.