प्रतिनिधी / असळज
गगनबावडा तालुक्यातील कातळी येथील लखमापूर येथे अनुसूचित जाती जमातीसाठी कोल्हापूर जिल्हा परिषदकडून आलेली विंधन विहीर (बोअर) दुसऱ्या ठिकाणी मारणाऱ्या मक्तेदार व ग्रामपंचायत सदस्यांकडून कातळी सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांनी निश्चित केलेल्या लखमापूर येथे विंधन विहीर पुन्हा मारण्यास भाग पाडले. त्यामुळे कातळी गावच्या ग्रामसेवक, सरपंच व सदस्य यांच्या कौतुकास्पद रोख ठोक कामाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.
कातळी ता. गगनबावडा येथे अनुसूचित जातीसाठी विंधन विहीर मंजूर झाली होती. हि विंधन विहीर सकाळी सहा वाजता गावात आल्यावर एका ग्रामपंचायत सदस्यांने सरपंच व ग्रामसेवक यांना पूर्व कल्पना न देताच धनगर समाजाची तीन घरे असणाऱ्या बिरू पावणा यांच्या घराजवळ हि विंधन विहीर (बोअर) मारली.
याबाबतची माहिती सरपंच व ग्रामसेवक ए. के. तटकरे यांना समजताच ज्या समाजासाठी हि विंधन विहीर (बोअर) मंजूर करण्यात आली आहे त्याच समाजासाठी हि विंधन विहीर (बोअर) मारणे गरजेचे असलेचे त्यांनी सांगितले. यानंतर सरपंच, ग्रामसेवक व सदस्य यांनी मक्तेदार व ग्रामपंचायत सदस्य यांना धारेवर धरले. लखमापूर येथील अनुसूचित जातीसाठी मंजूर होवून आलेली विंधन विहीर (बोअर) पूर्व कल्पना न देता का मारली? याबाबतचा खुलासा मागितला. याबाबतचा त्यांच्याकडून खुलासा घेवून ग्रामसेवकांनी तात्काळ अनुसूचित जातीमध्ये विंधन विहीर (बोअर) मारण्यास सांगितले आणि ती विंधन विहीर मारूनही घेतली. यामुळे ग्रामसेवक ए.के.तटकरे, सरपंच उज्वला पाटील, सदस्य उत्तम पाटील, कमल कांबळे, सुनिता लांबोर, नसिना, उषा पाटील, दिलावर मुल्लांणी, चंद्रकांत कांबळे, अशोक कांबळे, श्रीकांत कांबळे यांनी घेतलेल्या भूमिकेचे कातळी ग्रामस्थांतून कौतुक होत आहे.