नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशातील बारावी परीक्षेच्या संदर्भात आज महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदी बारावी परीक्षांचा महत्त्वाचा निर्णय घेणार आहेत.
सरकारने सुप्रीम कोर्टाकडे बारावीच्या परीक्षांच्या अंतिम निर्णयासाठी वेळ मागितला होता त्यानुसार ३१ मे रोजी बारावीच्या परीक्षेसंदर्भात १ जून रोजी केंद्रीय शिक्षण मंत्री अंतिम निर्णय घेतील असे सांगण्यात आले. मात्र केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियल निशंक यांची आज, मंगळवारी अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे आता देशातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
१५ ते २६ ऑगस्ट दरम्यान CBSE बोर्डाने बारावी बोर्डाची परीक्षा घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यानुसार सप्टेंबर महिन्यात परीक्षांचे निकाल देण्यात येतील. त्याचप्रमाणे मंडळाने दोन पर्याय दिले आहेत. ज्यात प्रमुख १९ विषयांवर अधिसूचित केंद्रांवर नियमित परीक्षा घेणे किंवा विद्यार्थी शिकत असलेल्या शाळांमध्ये अल्प कालावधीत परीक्षा घेण्याचे पर्याय देण्यात आले आहेत.