ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यातील निर्बंध हटवलेले नसून, नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले आहे. अनलॉकच्या 5 टप्प्याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, अशी माहिती समोर आली आहे.
मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारने लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी 5 टप्पे ठरवले आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे आणि ऑक्सिजनची उपलब्धता 25 टक्क्यांच्या आत असेल तिथे सर्व गोष्टी सुरू होतील, अशी माहिती दिली होती. मात्र, त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर काही तासातच सरकारच्या माहिती विभागाकडून एक प्रेसनोट जारी करत राज्यातील निर्बंध उठवण्यात आलेले नाहीत. टप्पेनिहाय निर्बंध शिथील करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे’, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणूचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत, असे राज्याच्या आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.