बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोविडची नवीन प्रकरणे सातत्याने कमी होत आहेत. पण, मृत्यूची संख्या वाढतच आहे. दरम्यान राज्यात मृतांचा आकडा सतत वाढत आहे. राज्यात सरासरी केस मृत्यु दर (सीएफआर म्हणजेच दर शंभर कोविड रूग्णांमधील मृत्यू) दोन टक्के आहे. तथापि, राज्यात असे सात जिल्हे आहेत जेथे सीएफआर दोन टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आरोग्य विभागासमोर हे सर्वात मोठे आव्हान आहे. ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होत आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जून महिन्याचा विचार केल्यास मंगळवारी ४६४, बुधवारी ४६३ आणि गुरुवारी ५४१रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच, या महिन्याच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये कोविडमुळे १,४४१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह एकूण मृत्यांची संख्या ३०,५३१ वर पोहोचली आहे.
दरम्यान, ४.९ च्या सीएफआरसह बिदर जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. बेंगळूर शहरी जिल्ह्यात सीएफआर ४.६.टक्के, गुलबर्गा ३.८ टक्के, हवेरी ४.४ टक्के, यादगीरमध्ये ३.२ टक्के, बेंगळूर ग्रामीणमध्ये २.९ टक्के, धारवाडमध्ये २.५ टक्के आणि बळ्ळारी जिल्ह्यात २.४ टक्के आहे. कोविड वॉर रूमच्या आकडेवारीनुसार, ११ जिल्ह्यांमध्ये सीएफआर १ ते २ टक्के आहे, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण १ टक्क्यांपेक्षा कमी आहे.