प्रतिनिधी/ रत्नागिरी
खरीप हंगाम सुरू असताना कोरोनासंदर्भात कडक निर्बंधांनी येथील शेतकऱयांना अडचणीत टाकले आहे. शेतीसाठी अनेक शेतकऱयांनी कर्ज काढून घेतलेली यंत्रे चालवण्यासाठी पेट्रोल पंपावर शेतकऱयांना पेट्रोल-डिझेल उपलब्ध होत नाही. यामुळे ऐन हंगामात प्रशासनाने शेतकऱयांची कोंडी केल्याचे म्हटले जात आहे.
रोहिणी नक्षत्राला सुरुवात होताच खरीप हंगामाला प्रारंभ होतो. या नक्षत्रात पाऊस आल्यास शेतकरी मशागतीला सुरुवात करतात. बियाणे, रासायनिक खते घेण्याची लगबग सुरू होते. शेतात नांगरणी व खत टाकण्याचे काम शेतकरी करत आहेत. परंतु, कडक निर्बंधांबुळे शेतकरी अडचणीत आला आहे. लॉकडाऊनमुळे अर्थचक्र थांबल्याने खरीप हंगामासाठी पैशांची जुळवाजुळव करण्याची चिंता शेतकऱयांसमोर आहे. शासनाने निर्बंध पुन्हा वाढवले तर खरीप हंगामाला समोर कसे जायचे, हा प्रश्न होता. पण कृषीविषयक साहित्यांची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
खरीप हंगामासाठी अनेक शेतकऱयांनी यापूर्वी व आताही कर्जे काढून पॉवरट्रिलरसारखी यंत्रे घेतली आहेत. पण लॉकडाऊनमुळे इंधनाअभावी ती चालवणे अवघड बनले आहे. शेतीकामांची जिल्हय़ात लगबग सुरू आहे. पेरणी, नांगरणीसाठी पॉवरट्रिलरला लागणारे पेट्रोल, डिझेल आणायचे कुठून, हा प्रश्न उभा ठाकला आहे. लॉकडाऊन घोषित करताना शेतकऱयांच्या या प्रश्नाचा विसर प्रशासनाला पडल्याचे सांगितले जात आहे. पेट्रोलपंपावर गेल्यावर कृषी अवजारे चालवण्यासाठी लागणारे इंधन देण्यास नकार दिला जात आहे. प्रशासनाचा दाखला घेऊन या, मगच शेतीसाठी पेट्रोल किंवा डिझेल देऊ, असे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या पदरी प्रशासनाने पुरती निराशा टाकली आहे. येथील शेतकऱयांची तुकडे पद्धतीची शेती आहे आणि बहुतांश शेती घरापासून दूर आहे. त्यामुळे सकाळी शेतात पॉवर ट्रिलर घेवून गेलेला शेतकरी शेत पूर्ण करूनच घरी परततो. यंत्रासोबत लागणारे जादा इंधनही तो सोबत घेउन जातो. थोडय़ा-थोडय़ा इंधनासाठी ग्रामीण भागातून पेट्रोलपंपात फेऱया मारणे, ही कष्टदायी बाब आहे. ते देखील इंधन शेतकऱयांना पंपावर देणे प्रशासनाने नाकारल्याची नाराजी शेतकऱयांतून व्यक्त केली जात आहे.
यंत्रणेतील असमन्वयामुळे शेतकऱयांसमोर प्रश्न
शेतकऱयांना शेतीच्या कामांसाठी कृषी अवजारांना लागणाऱया इंधनासाठी निर्माण झालेल्या समस्येसंदर्भात तालुका कृषी अधिकाऱयांना तहसीलदार प्रशासनस्तरावरून सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र त्या बाबत कृषी विभागस्तरावरून कार्यवाहीची प्रतीक्षा असल्याने शेतकऱयांना या समस्येला समोर जावे लागले आहे. पेट्रोलपंप चालकही शेतकऱयांनी इंधन घेण्यासाठी येताना प्रशासनाचे पत्र आणावे, असे सांगत असल्याने ही कोंडी अधिक वाढली आहे.