प्रतिनिधी/ सातारा
गतवर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन लागू केला. लॉकडाऊन लागू केल्यानंतर सुरुवातीला बाहेर काय चालले आहे हे पहायला येणाऱयांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून ते कालपर्यंत सातारा शहर व उपनगरात सातारा शहर पोलीस ठाणे, शाहुपूरी पोलीस ठाणे आणि सातारा नगरपालिका यांच्या माध्यमातून चौदा महिन्यात 6455 जणांच्यावर 30 लाख 51 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पालिकेला मात्र लॉकडाऊन चांगलाच मानवला असून पालिकेच्या तिजोरीत हा महसूल गोळा झाला आहे.
सातारा शहरात नागरिकांनी प्रथमच गतवर्षी लॉकडाऊन अनुभवला. 22 मार्चपासून हा लॉकडाऊन सुरु झाला. इतिहासात प्रथमच सर्वच शहराचे रहाटगाडगे थांबले. शहरातील सर्वच रस्ते निर्मनुष्य झाले होते. बाहेर फिरु नये कोणी म्हणून पोलिसांनी सुरुवातीला काठीचा प्रसाद दिला. तरीही सातारकर बाहेर येवून बाहेर काय चालले आहे हे पहात होते. त्यावेळी त्यांच्यावर जिल्हाधिकाऱयांच्या आदेशानुसार कारवाईला प्रारंभ झाला. त्यानुसार विनाकारण बाहेर पडणारे, विनामास्क लावणारे, सार्वजनिक जागेत थुंकणारे आदी कारवाया धुमधडाक्यात करण्यात आल्या. त्यामध्ये शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, शाहुपूरी पोलीस ठाण्याचे संजय पतंगे यांनी त्यांच्या सर्व पोलीस कर्मचाऱयांना आदेश दिले होते. तसेच सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनीही पथक नेमून कारवाईचे अधिकार दिले होते. गेल्या 14 महिन्यात पालिका हद्दीत एकूण 6455 केसेस करण्यात आल्या. त्यांच्याकडून 30 लाख 51 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून तो पालिकेकडे जमा करण्यात आला आहे.