घोटाळय़ांचे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अयोध्येत रामजन्मस्थानी भव्य राम मंदिराची निर्मिती करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या न्यासाने नुकत्याच केलेल्या भूमी व्यवहारांचे सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे. न्यासाने वाजवीपेक्षा कितीतरी अधिक किमतीत भूमीखरेदी केल्याचा आरोप आम आदमी पक्ष आणि समाजवादी पक्षाने रविवारी केला होता.
या आरोपांसंदर्भात सोमवारीच स्पष्टीकरण करण्यात येऊन सर्व आरोप नाकारण्यात आले होते. तथापि, मंगळवारी पुन्हा न्यासाने सर्व व्यवहारांचे स्पष्टीकरण देत घोटाळा नसल्याचे दाखवून दिले. जमीनीचा दर कशाप्रकारे ठरविण्यात आला आणि तो कसा चुकता केला गेला याची कागदपत्रेही न्यासाने सादर केली आहेत. त्यामुळे वादावर पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कसा झाला व्यवहार ?
भूमी खरेदी करण्यासाठीच्या व्यवहारात 9 लोक सहभागी झाले होते. त्यांच्या अनुमतीनेच व्यवहार अतिशय पारदर्शी पद्धतीने पूर्ण करण्यात आला. सर्व व्यवहार बँकेच्या माध्यमातून आणि चेकने करण्यात आला. याची कागदपत्रे असल्याने भ्रष्टाचाराला कोठेही स्थान नाही. 9 जणांमध्ये 3 मुस्लीम आहेत. सर्व 9 संबंधित लोकांशी चर्चा व सविस्तर बोलणी करण्यात आली आहेत. न्यासाने व्यवहार कसा झाला हे पुढील मुद्दय़ांच्या आधारे स्पष्ट केले आहे-
1. असे आणखीही तीन चार व्यवहार न्यासाने केले आहेत. त्यांच्या माध्यमातून अयोध्येतील काही मंदिरे आणि आश्रम घेण्यात आले आहेत. या सर्व मंदिरांना आणि आश्रमांना त्यांच्या निवडीनुसार पर्यायी भूमी देण्यात आली असून तेथे त्यांचे पुनर्वनस केले जाणार आहे. त्यासाठी त्यांना पुरेशी रक्कम दिली जाईल.
2. 18 मार्च 2021 या दिवशी रविमोहन तिवारी आणि सुल्तान अन्सारी यांनी भूखंड क्रमांक 243,244 आणि 246 यांची खरेदी खरेदीपत्रद्वारे, 2 कोटी रूपयांना केली. या भूखंडांचा सरकारी दर 5.80 कोटी रूपये इतका आहे. या रकमेवर मुद्रांश शुल्क (स्टँप डय़ूटी) खरेदीदारांनी भरली. त्याच दिवशी तिवारी आणि अन्सारी यांनी हे भूखंड राम जन्मभूमी न्यासाला विकण्याचा करार केला.
3. या भूखंडांची किंमत सरकारी दरानुसार 18.50 कोटी रुपये इतकी ठरविण्यात आली होती. यापैकी 17 कोटी रूपये ऑन लाईन पद्धनीने देण्यात आले. याची नोंद उपलब्ध आहे. हे भूखंड रेल्वे स्थानकाजवळ असून अत्यंत मोक्याच्या स्थानी आहेत. अयोध्येत सध्या जो बाजारी दर सुरू आहे त्यापेक्षा कितीतरी कमी दराने हे भूखंड खरेदी करण्यात आले आहेत.
4. रविमोहन तिवारी आणि सुल्तान अन्सारी यांनी हे भूखंड कुसुम तिवारी यांच्याकडून 2 कोटी रुपयांना खरेदी केले. मात्र ही दोन कोटी रुपयांची रक्कम अनेक वर्षांपूर्वी ठरली होती व तसा करारही झाला होता. त्यानंतर अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीला प्रारंभ झाल्यानंतर येथील भूखंडांचे दर अचानक वेगाने वाढले आहेत. कारण येथे यापुढे पर्यटक व भाविकांची गर्दी होणार आहे.
5, या कारणास्तव याच भूखंडांची सरकारी किंमत 18.5 कोटी रुपये ठरविण्यात आली होती. तथापि, प्रत्यक्षात बाजारी दर यापेक्षा कितीतरी जास्त आहे. तरीही हे देवाचे कार्य असल्याने भूखंडांच्या मालकांनी सरकारी दरात ते न्यासाला देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे खरेदी करण्यात आली.