टस्कराने महिन्यांपासून ठाण मांडल्याने कबनाळी ग्रामस्थ संतप्त : मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन
खानापूर : कबनाळी गावच्या समस्या सोडवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले जातील, तसेच शासनाकडून मिळणारी आर्थिक मदतही तातडीने देण्याचे नियोजन पेले जाईल, मात्र लोकशाहीच्या उत्सवात मतदानावर बहिष्कार हे योग्य नाही. यासाठी कबनाळी ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घालू नये, शंभर टक्के मतदान करून आपली लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन सहाय्यक निवडणूक अधिकारी बलराम चव्हाण यांनी कबनाळी येथील ग्रामस्थांच्या सभेत व्यक्त केले. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी सुनिता निंबरगी, तहसीलदार प्रकाश गायकवाड, स्वीप कमिटीच्या अध्यक्षा भाग्यश्री जहागीरदार यासह इतर खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. कबनाळी येथे गेल्या महिन्याभरापासून एका टस्कर हत्तीने ठाण मांडले असून उन्हाळी भाताचे तसेच केळी, आंबा, काजू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. ग्रामस्थांनी याबाबत आमदार विठ्ठल हलगेकर, वनखात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देवून हत्तीच्या बंदोबस्ताची मागणी केली होती.
मात्र याबाबत ठोस कारवाई झाली नसल्याने ग्रामस्थांनी लोकसभेच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्काराचा निर्णय जाहीर केला होता. याची निवडणूक अधिकारी बलराम चव्हाण यांनी गांभीर्याने दखल घेत कबनाळी येथे वन कर्मचारी आणि तहसीलदारांसह इतर खात्याच्या अधिकाऱ्यांना घेऊन ग्रामस्थांची बैठक घेऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला. आणि मतदानावरील बहिष्कार मागे घेण्यासाठी आवाहन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी हत्तीने केलेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई तसेच गावचा रस्ता आणि हत्तीच्या बंदोबस्ताची मागणी लावून धरली. यावेळी सहाय्यक वनाधिकारी निबंरगी यांनी हत्तीच्या बंदोबस्तासाठी योग्य तो क्रम हाती घेण्यात येईल, यासाठी वनकर्मचाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली आहे. तसेच हत्तीने केलेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई येत्या काही दिवसात पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठविला जाईल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील, तसेच रस्त्यासाठी वनखात्याकडून कोणतीही अडवणूक होणार नाही, कंत्राटदाराने रस्त्याचे काम केंव्हाही सुरू करावे, असे त्यांनी बैठकीत जाहीर केले. यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांनी मतदानाबाबत माहिती दिली. आणि बहिष्काराचा निर्णय मागे घेऊन येणाऱ्या 7 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत शंभर टक्के मतदान करावे, असे आवाहन केले. यावेळी ग्रामस्थांनी आपला बहिष्काराचा निर्णय मागे घेतल्याचे जाहीर करून आम्ही मतदान करू, असे सांगितले. यावेळी कबनाळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.