पुणे : राज्यात उद्योगांची संख्या वाढवून रोजगार निर्मिती करणे, तसेच नवे उद्योग आणण्यासाठी सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. लवकरच केंद्र आणि राज्य सरकारची संयुक्त बैठक होणार असल्याचे केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सांगितले.
राणे यांच्या हस्ते आज पुण्यात G-20 परिषदेचे उद्घाटन झाले. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, आपल्या राज्यात नवीन उद्योग यावेत, यासाठी राज्य सरकार जमीन आणि करात काही प्रमाणात सवलत देतात. मात्र, पायाभुत सुविधांमुळे आपल्या राज्यात जमीनीचा दर अधिक आहे. अशा वेळी इतर राज्यांनी संपर्क साधून अधिक सुविधा देण्याचे आश्वासन त्या कंपन्यांना दिले असावे. त्यामुळे राज्यातील उद्योग इतर राज्यात गेले. मात्र, जे उद्योग बाहेर गेले ते परत राज्यात आल्याचा माझा अनुभव आहे. सद्य:स्थितीत उद्योगावरून ज्या चर्चा सुरू आहेत. ते केवळ राजकारण असल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जी 20 परिषदेमुळे जगात देशाचे नाव होत आहे. देशाची व शहरांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ही परिषद उपयुक्त ठरणार आहे. 2030 पर्यंत आपण पाचव्या स्थानावर येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारची योजना आहे. शहरांची पायाभूत सुविधा कशी असेल यावर परषदेत चर्चा होईल. केंद्र व राज्य करकारतर्फे महापालिकांसाठी निधी उपलब्ध केला जाईल.