तालुक्यातील नदी-नाले प्रवाहित : शेतीची कामे सुरू झाल्याने बळीराजा सुखावला
वार्ताहर /किणये
बेळगाव तालुक्यात आर्द्रा नक्षत्राने मंगळवारी शेवटच्या दिवशी जोरदार सलामी दिली. सकाळपासूनच दिवसभर मुसळधार पाऊस पडला. यामुळे नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.
यंदा तालुक्यात पावसाचे गणितच कोलमडून गेले होते. खरीप हंगामाला सुरुवात होऊनही म्हणावा तसा पाऊस झाला नव्हता. जुलै महिन्याला सुरुवात होऊनही मुसळधार पावसाचा पत्ताच नव्हता. यामुळे शेतकऱयांची चिंता वाढली होती. पाऊस नसल्यामुळे खरीप हंगामातील पिके घ्यायची कशी? याची चिंता बळीराजाला लागून होती.
गेल्या चार-पाच दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण दिसून आले. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या, पण शेतकऱयांना खरीप हंगामासाठी हवा तसा दमदार पाऊस मंगळवारी झाला.
दि. 8 जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली, पण ते नक्षत्रही कोरडेच गेले. दि. 22 जूनपासून आर्द्रा नक्षत्राला सुरुवात झाली. या नक्षत्राच्या पावसाने काही प्रमाणात हजेरी लावली. पण शेतशिवारात पाणी साचले नाही. नदी-नाले प्रवाहित झाले नव्हते. यामुळे यंदा पावसाचा अंदाज चुकणार की काय? अशी चिंता शेतकऱयांना लागून राहिली होती.
अखेर मंगळवार दि. 5 जुलै रोजी पहाटेपासूनच तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. पावसाची संततधार दिवसभर सुरूच होती. दि. 5 जुलै हा आर्द्रा नक्षत्राचा शेवटचा दिवस होता. या नक्षत्राने शेवट गोड केला. दि. 6 जुलैपासून पुनर्वसू नक्षत्राला प्रारंभ होणार आहे. पश्चिम भागातील किणये-संतिबस्तवाड भागात असलेल्या मुंगेत्री नदीच्या प्रवाहाला मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. मंगळवारी तालुक्याच्या इतर भागाच्या तुलनेत पश्चिम भागात जास्त पाऊस झाला असून खरीप हंगामातील शेतातील कामांना जोर येणार
आहे.