पश्चिम बंगालमध्ये संदेशखाली येथे सीबीआयने तीन दिवसांपूर्वी टाकलेल्या धाडीत सापडलेल्या मोठ्या शस्त्रसाठ्याच्या मुद्द्याने राजकीय वळण घेतले आहे. निवडणुकीच्या काळात हिंसाचार घडवून मतदारांच्या मनात भीती निर्माण करण्याचे कारस्थान तृणमूल काँग्रेसने रचले होते. म्हणून एवढा मोठा शस्त्रसाठा सज्ज ठेवण्यात आला होता, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला होता. मात्र, हे भारतीय जनता पक्षाचेच कारस्थान असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. हा आमच्या पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे या पक्षाचे म्हणणे आहे. पक्षाने या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली असून निवडणूक आयोगाकडेही अर्ज सादर केला असल्याची माहिती देण्यात आली.
दहशतवाद्यांना समर्थन
तृणमूल काँग्रेसच्या काळात पश्चिम बंगाल हे राज्य दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनले आहे. राज्य सरकार धर्मांध गुंडांना संरक्षण देत आहे. त्यामुळे हे गुंड उघडपणे शस्त्रास्त्रांसह राज्यात कोठेही संचार करीत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या सांगण्यावरुन पोलिसही या गुंडांविरोधात कोणतीही कारवाई करत नाहीत. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनता जीव मुठीत धरुन जगत आहे. धर्मांध गुंडांच्या दहशतवादाला खतपाणी घातले जात आहे, असेही आरोप करण्यात आले आहेत.
लोक धडा शिकविण्यासाठी सज्ज
तृणमूल काँग्रेसच्या पापांचा घडा आता भरत आला असून राज्यातील त्रासलेले मतदार या पक्षाला धडा शिकविण्यासाठी सज्ज झाले आहेत. लोक आपल्या विरोधात आहेत, याची जाणीव आता तृणमूल काँग्रेसला झाली असून त्यामुळे या पक्षाचे नेते अधिकच चवताळले आहेत. तृणमूलच्या राज्यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक फायद्यात चाललेला उद्योग म्हणजे बाँब बनविण्याचा उद्योग आहे, अशी बोचरी टीका भारतीय जनता पक्षाने शस्त्रसाठा सापडल्यानंतर केली होती.
साठ्यात काय सापडले…
सीबीआयच्या धाडीत संदेशखालीत मोठा शस्त्रसाठा सापडला होता. त्यात पोलिसांच्या पिस्तुलाचाही समावेश होता. याशिवाय विदेशी बनावटीची अनेक पिस्तुले, गोळ्या, संपर्क साधने इत्यादी सामग्री हस्तगत करण्यात आली होती. या भागात दोन घरांवर सीबीआयने गेल्या शुक्रवारी छापे घातले होते. हा शस्त्रसाठी या भागातील बाहुबली शहाजहान शेख याच्याशी संबंधित असल्याचे बोलले जाते.