सर्वोच्च न्यायालयात सुनावणी ः पोर्तुगालला दिलेले आश्वासन पूर्ण करावे लागणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पोर्तुगाल सरकारला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यास आणि 1993 च्या मुंबईमधील साखळी स्फोटांचा गुन्हेगार अबू सालेमची 25 वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्यावर त्याची मुक्तता करण्यास भारत सरकार बांधील असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी म्हटले आहे. 2002 मध्ये प्रत्यार्पणासाठी भारताकडून पोर्तुगालला देण्यात आलेल्या आश्वासनानुसार 25 वर्षांपेक्षा अधिक काळाची शिक्षा होऊ शकत नसल्याचे सालेमने याचिकेद्वारे म्हटले होते.
केंद्र सरकार घटनेतील कलम 72 अंतर्गत प्राप्त अधिकाराचा वापर आणि शिक्षा पूर्ण झाल्यावर राष्ट्रीय प्रतिबद्धतेच्या अंतर्गत राष्ट्रपतींना सल्ला देण्यास बांधील आहे. आवश्यक दस्तऐवज 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या एक महिन्याच्या आत प्रक्रियेसाठी सादर केले जावेत, असे न्यायाधीश एस. के. कौल आणि एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने म्हटले आहे.
2005 साली प्रत्यार्पण
एका विशेष टाडा न्यायालयाने 25 फेब्रुवारी 2015 रोजी सालेमला मुंबईतील बिल्डर प्रदीप जैन यांच्या हत्येसह अन्य एका प्रकरणी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. जैन यांच्यासोबत त्यांचा चालक मेहंदी हसन देखील मारला गेला होता. मुंबईतील 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटांचा गुन्हेगार असलेल्या सालेमला एका दीर्घ कायदेशीर लढाईनंतर 11 नोव्हेंबर 2005 रोजी पोर्तुगालमधून प्रत्यार्पित करण्यात आले होते.
25 वर्षांच्या गणनेवरून पेच
25 वर्षांच्या शिक्षेत पोर्तुगालमधील तुरुंगवासही जोडण्यात यावा, अशी मागणी सालेमने केली होती. सालेमला 2002 साली पोर्तुगालमध्ये ताब्यात घेण्यात आले होते. परंतु त्याला भारतात 2005 साली आणले गेले. परंतु सालेमची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने भारत सरकारच्या गणनेनुसार त्याच्या 25 वर्षांच्या तुरुंगवासाचा कालावधी नोव्हेंबर 2030 मध्ये पूर्ण होणार आहे. पोर्तुगाल सरकारला देण्यात आलेल्या आश्वासनानुसार सालेमला 25 वर्षांच्या शिक्षेनंतर मुक्त केले जाईल.
पोर्तुगालची अट
पोर्तुगालची राजधानी लिस्बनमध्ये पोलिसांनी अबू सालेमला त्याची कथित प्रेयसी मोनिका बेदीसोबत 2002 साली बनावट दस्तऐवजांसह प्रवास केल्याप्रकरणी अटक केली होती. त्यादरम्यान भारत आणि पोर्तुगाल यांच्यात प्रत्यार्पण करार झालेला नव्हता. पोर्तुगालने सालेमला भारतात पाठविण्यासाठी त्याला मृत्युदंड किंवा 25 वर्षांपेक्षा अधिक शिक्षा न ठोठावण्याची अट ठेवली होती. 2007 मध्ये भारत आणि पोर्तुगाल यांच्यात प्रत्यार्पण करार झाला होता.