दिवसा बंदी असतानाही अवजड वाहतूक : चोर्ला मार्गावर प्रवाशांच्या जीवाला धोका
प्रतिनिधी /वाळपई
गोवा बेळगाव दरम्यानचा चोर्ला घाट परिसरातील अवजड वाहतुकीमुळे दिवसेंदिवस धोकादायक बनू लागलेला आहे. अनेकवेळा सदर वाहतूक बंद करावी, अशी मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केला जात आहे. यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. गुरुवारी सकाळी तुळशीमळा पर्ये येथे 14 चाकी ट्रक कलंडल्यामुळे अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सदर ट्रकचा चालक व कंडक्टरने पलायन करून आपला जीव वाचविला. नागरिकांनी या रस्त्यावरील दिवसेंदिवस अवजड वाहतूक वाढत असल्यामुळे तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त केलेला आहे .
गोवा बेळगाव दरम्यानच्या चोर्ला घाट परिसरातून दिवसा अवजड वाहतुकीला बंदी घालण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिलेला आहे. मात्र या आदेशाची अंमलबजावणी करण्याकडे संबंधित सरकारी खात्याची यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. गेल्या आठ दिवसांपासून अवजड वाहतुकीत प्रचंड वाढ झालेली आहे. यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱया प्रवासी वर्गांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे.
गुरुवारी सकाळी तुळशीमळा पर्ये येथे एक 14 चाकी ट्रक रस्त्याच्या बाजूला कलंडल्यामुळे मोठा अपघात झाला. सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र अवजड वाहतुकीला बंदी असतानाही या महामार्गावरून कशाप्रकारे वाहतूक होत आहे, असा सवाल करून स्थानिकांनी आक्रमक रूप धारण केले. या महामार्गावरून होणारी अवजड वाहतूक याला सरकारची यंत्रणा बळी पडलेली आहे. यामुळे नागरिकांनी हप्तेबाजीचा संशय व्यक्त केलेला आहे.
अपघातानंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करून आक्रमक भूमिका घेतल्यामुळे ट्रक चालकाने व क्लीनरने पोबारा करून आपला जीव वाचविला. मात्र नागरिकांना घटनास्थळी एकत्र होऊन संताप व्यक्त करीत होते.