वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसामच्या नागांव जिल्ह्य़ात जमावाकडून हिंसेदरम्यान एक पोलीस स्थानक पेटवून देण्यात आले होते. याप्रकरणातील मुख्य आरोपीचा सोमवारी सकाळी कथितपणे पोलीस कोठडीतून पलायनाच्या प्रयत्नादरम्यान एका दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. आरोपी आशिकुल इस्लाम पलायन करत असताना पोलीस वाहनाची धडक बसल्याने मारला गेला असल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली आहे.
दुर्घटनेनंतर आरोपीला नागांव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. जेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. या दुर्घटनेत एका उपनिरीक्षकासह 5 पोलीस जखमी झाल्याचे पोलीस अधीक्षक लीना डोले यांनी सांगितले आहे.
इस्लामला रविवारी अटक करण्यात आली होती. चौकशीच्या आधारावर पोलिसांचे पथक शस्त्रास्त्रs आणि दारूगोळा हस्तगत कण्यासाठी त्याला जुरिया येथील त्याच्या घरी नेण्यात आले. पोलिसांनी त्याच्या घरातून दारूगोळय़ासह दोन बंदुका हस्तगत केल्या होत्या. 21 मे रोजी बटाद्रवा पोलीस स्थानकाला पेटवून देण्यासाठी जमावाला चिथावणी देताना इस्लाम दिसून आला होता.
11 जणांना अटक
एका मासेविक्रेत्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यावर जमावाने पोलीस स्थानक पेटवून दिले होते. याप्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली आहे. मासेविक्रेता सफीकुल इस्लामचा मृत्यू प्रकृती अस्वास्थामुळे झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता. तर मुक्ततेच्या बदल्यात 10 हजार रुपयांची मागणी पोलिसांनी केली होती असा आरोप सफीकुलच्या कुटुंबीयांनी केला होता.
आरोपींची घरे जमीनदोस्त
सफीकुलच्या मृत्यूनंतर संतप्त जमावाने पोलीस स्थानकाला पेटवून दिले होते. या प्रकारात सामील लोकांच्या घरांना अतिक्रमण ठरवून प्रशासनाने ती पाडविली होती. या पूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.