प्रतिनिधी / बेळगाव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना आपल्या देशाचे धर्मग्रंथ ठरले आहे. जाती-भेद नष्ट करुन संपूर्ण देशातील नागरिकांचे हित लक्षात घेवून बाबासाहेबांनी घटना लिहिली. त्या घटनेवरच देशाची वाटचाल सुरू आहे. त्याचे श्रेय त्यांना जाते, असे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील बाबासाहेबांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करुन ते बोलत होते. प्रशासनातर्फे जयंती दिनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. बाबासाहेबांनी शोषितांना न्याय दिला. शिक्षणामुळेच प्रगती शक्य आहे, हे समाजाला त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे अनेकांनी शिक्षण घेवून समाजामध्ये बदल घडविला. बाबासाहेबांच्या अफाट ज्ञानामुळे ते ज्ञानसुर्य ठरले, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले, बाबासाहेबांच्या जयंती दिनी नवनवीन विचारांवर चिंतन झाले पाहिजे. मागासवर्गीयांनी शिक्षणाबरोबरच आर्थिकदृष्टय़ा सुदृढ होण्याची गरज आहे. तरच ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होवू शकतात. केवळ एका दिवसापुरती जयंती सिमीत करु नये. त्यांच्या विचारांचे चिंतन आणि मंथन सदैव व्हावे.
शाहू महाराज, बुध्द पुतळय़ांची स्थापना करा
छत्रपती शाहू महाराज व गौतम बुध्दांच्या प्रतिमा स्थापन करण्यासाठी यापूर्वीच्या सरकारने अनुदान राखीव ठेवले होते. पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी या दोन्ही राष्ट्र पुरूषांची प्रतिमा उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली.