काही कारणास्तव पडला होता बंद ; नवीन पिढीने पुढाकार घेऊन देवीची मिळवली ऐतिहासिक मान्यता.सर्वांनी संघटीतपणे शिमगोत्सव साजरा करण्याचा केला संकल्प,आजपासून तीन दिवस चालणार गडेउत्सव
डिचोली : डिचोली तालुक्यातील नार्वे या निसर्गसंपन्न अशा गावात यावर्षी 25 वर्षांच्या दिर्घ खंडानंतर शिमग्याचा उत्साह संचारणार आहे. काही कारणास्तव गावातील शिमगोत्सव 25 वर्षांपूर्वी बंद पडला होता. तो पुन्हा सुरू करण्यासाठी मध्यंतरी प्रयत्नही झाले होते पण ते यशस्वी झाले नव्हते. तर यावर्षी या गावातील चारही वाड्यावरील लोकांनी विशेषत: युवा पिढीने पुढाकार घेऊन संघटीतपणे नार्वे गावची ग्रामदेवी श्री शांतादुर्गेला साकडे घालून प्रसाद लावला. या प्रसादात देवीने सकारात्मक कौल दिला आणि नार्वेत शिमगोत्सवा आधीच सर्वांच्या तोंडावर उत्साह ओसंडून वाहू लागला. नार्वे गावात गेल्या 25 वर्षांत जन्मलेल्या तसेच या गावची सून म्हणून गावात प्रवेश केलेल्या वधुंना या गावातील शिमगोत्सव म्हणजे एक इतिहासातील गोष्ट असल्याची भावना होती कारण त्यांनी या शिमगोत्सवाच्या गोष्टी केवळ ऐकल्या असाव्यात, प्रत्यक्षात मात्र गावचा शिमगोत्सव कधी अनुभवलाच नाही. परंतु यावर्षी प्रथमच गावातील नवीन पिढी, लहान मुले, पंचवीस वर्षांपासून या गावात असलेल्या वधु यांच्याबरोबरच जाणत्या जेष्ठ नागरिकांनाही यावर्षी गावच्या शिमगोत्सवाचा आनंद लुटता येणार आहे. याच कारणास्तव सध्या गावात सर्वत्र उत्साही वातावरण पसरले आहे.
देवीच्या ऐतिहासिक मान्यतेने सर्वांचे चेहरे समाधानी हास्याने खुलले
नार्वे हा तसा लहान गाव या गावात पंचायत पातळीवर जरी सात प्रभाग असले तरी भौगोलिकदृष्ट्या या गावात चार वाडे आहेत. देऊळवाडा, मुर्डीवाडा, तारवाडा (तार, तळे व हांदळे) व गावकरवाडा (गावकरवाडा, कोनाडीवाडा) असे चार वाडे असून या चार वाड्यांचा प्रत्येकी वेगवेगळे चार शिमग्याचे मांड आहेत. या चारही मांडावरील लोकांनी एकत्रित येऊन ग्रामदेवी श्री शांतादुर्गेला प्रसाद लावला व गावातील शिमगोत्सव पुन्हा गुण्यागोविंदाने सुरू करण्यासाठी सकारात्मक कौल मागितला. देवीने गेल्या सोमवार दि. 27 फेब्रुवारी रोजी आपला कौल देत गावच्या शिमगोत्सवाला ऐतिहासिक मान्यता दिली. देवीही गावातील शिमगोत्सवाला राजी झाल्याने प्रत्येकाच्या तोंडावर उत्साहा बरोबरच समाधानी हास्य पसरले.
आजपासून होणार गडेउत्सवाला प्रारंभ
शिमगोत्सवाला देवीची मान्यता मिळताच लगेच गावात या शिमगोत्सवाच्या तयारीला सुरूवात झाली. गावातील शिमगोत्सवाला होळी पौर्णिमेच्या आधी आपापल्या मांडावर श्रीफळ वाढविण्याची प्रथा आहे. ही प्रथा बुधवार दि. 1 मार्च रोजी पार पडली. प्रत्येक मांडावर त्या त्या मांडाच्या मानकऱ्यांनी श्रीफळ वाढविले. त्यानंतर पौर्णिमेच्या आधी दोन दिवस गडेउत्सवाला प्रारंभ होणार आहे. म्हणजेच आज शनिवार दि. 4 मार्च रोजी पासून तीन दावशीय गडेउत्सव सुरू होणार आहे. शनिवार व रविवारी गडे पडल्यानंतर सोमवारी (दि. 6) रात्री गावात होळी उभी केली जाणार आणि त्या रात्री पुन्हा गडे पडणार आहेत. सदर गडे मंगळवारी सकाळी पुन्हा मांडावर येणार आणि या गडेउत्सवाची सांगता होणार आहे.
होळीच्या तिसऱ्या दिवशी गावात रोमटामेळ व खेळे
होळीच्या तिसऱ्या दिवशी गावातील चारही वाड्यांच्या मांडांवरून देवी श्री कणकेश्वरी मंदिराकडे रोमटामेळ येणार. ते झाल्यानंतर गावात खेळे सुरू होणार. सदर खेळांची सुरूवात ही सप्तकोटीश्वर मंदिराकडून होणार व नंतर गावातील चारही वाड्यांवरील प्रत्येक घराच्या दारात हे रोमट जाऊन खेळे सादर करणार. हे रोमट खेळे सादर झाल्यानंतर गुढीपाडव्याच्या दोन दिवसपूर्वी श्री शांतादुर्गा मंदिरासमोर दोन शिमग्याची नाटके होणार आहेत. पाडव्याच्या आदल्या दिवशी गावात रंगपंचमी म्हणजेच गावची धुळवड साजरी होणार. तत्पूर्वी आदल्या दिवशी श्री शांतादुर्गा देवीची पालखी परंपरेप्रमाणे बाहेर काढली जाणार आहे नार्वे गावचा शिमगोत्सव बंद पडल्याने गेली पंचवीस वर्षे गावातील शिमगोत्सवातील पारंपरिकता लोपच पावली होती. होळी पौर्णिमेला गावातील ठराविक मानकरी लोक परंपरेप्रमाणे होळी रोवत होते. त्यानंतरचे कोणतेक्षी कार्यक्रम गावात होत नव्हते. थेट पाडव्यापूर्वी पालखी मिरवणूक आणि आदल्या दिवशी धुळवड साजरी केली जायची. यावर्षी मात्र नार्वेतील लोकांना पूर्ण स्वरूपातील शिमगोत्सव पाहण्याची, अनुभवण्याची व त्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.