घरीच राहण्याचा सल्ला : लष्कर-निमलष्करी दलांमध्ये युद्ध सुरू
वृत्तसंस्था/ खार्तूम
सुदानमध्ये राहणाऱ्या भारतीयांना देशाच्या मिशनने तयार केलेल्या आश्र्रयस्थानांमध्ये आश्र्रय घेण्यास सांगण्यात आले आहे. देशाची राजधानी खार्तूममध्ये निमलष्करी दल आणि लष्कराने एकमेकांच्या तळांवर हल्ले केल्यानंतर आफ्रिकन देशात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. याचदरम्यान राष्ट्रपती भवनावरही ताबा मिळविल्याचा दावा निमलष्करी दलाने केला आहे.
गोळीबार आणि चकमकीच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर सर्व भारतीयांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संघर्षमय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत भारतीयांनी घरातच राहावे आणि त्वरित प्रभावाने बाहेर जाणे टाळावे, अशी सूचना खार्तूममधील भारतीय दुतावासाने केली आहे.
निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्सच्या (आरएसएफ) नियमित सैन्यातील एकीकरणावरून काही आठवड्यांच्या तणावानंतर शनिवारी देशात हिंसाचार सुरू झाला. निमलष्करी दलाने सेनेच्या मुख्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर संघर्ष चिघळल्याचे सांगण्यात आले. दक्षिण खार्तूममधील आरएसएफ तळाजवळ चकमक झडली असून स्फोट आणि गोळीबार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले. तसेच क्षेपणास्त्रांच्या माऱ्यानंतर परिसरातील नागरिक स्वत:ला वाचवण्यासाठी धावताना दिसले. आरएसएफने खार्तूम विमानतळाचा ताबा घेतला आहे. 2021 मध्ये जनरल अब्देल-फतेह बुरहान यांच्या नेतृत्वाखालील लष्करी बंडानंतरच सुदानमध्ये अराजकतेची स्थिती आहे.