नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय वायुदलाने आपल्या आयएनएस विशाखापट्टणम या युद्धनौकेवरुन भूपृष्ठावरुन आकाशात मारा करणाऱया क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे. मंगळवारी परीक्षण करण्यात आले. या क्षेपणास्त्रामुळे वायुदलाच्या मारक शक्तीमध्ये मोठी वाढ होणार असून वायुदलाचे सामर्थ्य अधिक होणार आहे.
हे क्षेपणास्त्र एमआरएसएएम या नावाने ओळखले जाते. हे पूर्णतः भारत निर्मित क्षेपणास्त्र असून त्याचा विकास संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) इन्स्टिटय़ूट ऑफ ऍक्चुअरिज ऑफ इंडिया (आयएआय) बरोबर संयुक्तरित्या केला आहे. या क्षेपणास्त्राची निर्मिती भारत डायनॅमिक्स लिमिटेड या कंपनीच्या उत्पादन केंद्रात झाली आहे. केंद्र सरकारचे आत्मनिर्भरतेचे धोरण भारतीय नौदलाने गंभीरपणे स्वीकारले असल्याचे यावरुन स्पष्ट होते.
क्षेपणास्त्र विरोधी क्षेपणास्त्र
भारतीय युद्धनौकांवर शत्रूने क्षेपणास्त्र हल्ला केल्यास त्या क्षेपणास्त्रांना आकाशातच नष्ट करण्याची क्षमता या भारतीय निर्मितीच्या क्षेपणास्त्रात आहे. त्यामुळे या पुढे आपल्याला अशा प्रकारच्या क्षेपणास्त्रांच्या पुरवठय़ासाठी अन्य देशांवर विसंबून रहावे लागणार नाही. आणखी काही परीक्षणे झाल्यानंतर या क्षेपणास्त्र व्यवस्थेची पूर्ण निर्मिती भारतातच केली जाणार आहे.