पालेकर, वाघ, दत्तप्रसाद, अशोक गेले चौकशीला सामोरे : केजरीवाल सरकारच्या दारु घोटाळ्याचे गोवा कनेक्शन
पणजी : दिल्ली येथील कथित मद्य घोटाळ्याचे गोव्याशी असलेले कनेक्शन आणि यात गुंतलेल्या गोव्यातील चार नेत्यांची काल गुरुवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पणजीतील अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. गोव्यात गत विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाद्वारे सुमारे 45 कोटी ऊपये वापरण्यात आल्याच्या अनुषंगाने ही चौकशी ईडीद्वारे करण्यात आली. पाटो-पणजी येथील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात गुऊवारी सकाळी आपचे गोव्यातील संयोजक अमित पालेकर, भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक, मद्य व्यवसायिक दत्तप्रसाद नाईक व प्रा. रामराव वाघ हे चारहीजण ईडीच्या चौकशीला सामोरे गेले. या चारही जणांना बुधवारी ईडीने समन्स बजावले होते. त्यानुसार काल त्यांची दिवसभर चौकशी झाली.
सुमारे दहा तास चौकशी
अमित पालेकर, भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक, मद्य व्यवसायिक दत्तप्रसाद नाईक व प्रा. रामराव वाघ हे चारहीजण सकाळी 10 वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहिले. रात्री आठ वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. दुपारी जेवणासाठी त्यांना बाहेर सोडण्यात आले होते. सुमारे दहा तास चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. परंतु गरज पडेल त्यावेळी पुन्हा चौकशीस उपस्थित राहण्यासंबंधी सूचनाही ईडीच्या अधिकाऱ्यांनी या चौघांना केली आहे.
विषयावर बोलणे टाळले
सकाळी चौघेही नेते ईडीच्या कार्यालयात एकाचवेळी चौकशीला उपस्थित राहिले परंतु तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलण्याचे टाळले. आपचे संयोजक पालेकर यांना ईडीने पाठवलेल्या समन्सविषयी विचारले असता, ते म्हणाले, चौकशी सुरू असताना आपण बोलणे नियमाला धरून नाही. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे माहिती मागितली आहे, ही माहिती आपण ईडीसमोर सादर करणार आहे, असे त्यांनी उत्तर दिले.
आम्ही चौकशीला सामोरे जातो
प्रा. रामराव वाघ यांनीही चौकशीसंबंधी एक चकार शब्द काढला नाही. मद्य व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक तसेच भंडारी समाज संघटनेचे अध्यक्ष अशोक नाईक यांनीही सध्यातरी आम्ही चौकशीला सामोरे जात आहोत, असे सांगून पत्रकारांच्या प्रश्नांना बगल दिली. आपचे आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनाही चौकशीसाठी ईडीचे अधिकारी समन्स पाठवणार आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या रडावर अनेकजण असून, अनेकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
दुपारी जेवणासाठी मोकळीक
अमित पालेकर, रामराव वाघ, दत्तप्रसाद नाईक व अशोक नाईक यांना ईडीने बुधवारी समन्स बजावल्यानुसार काल गुऊवारी सकाळी हे चौघेही ईडीच्या कार्यालयात हजर राहिले. दिवसभर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यांना सकाळपासून कोणतीच मोकळीक दिली नाही. परंतु दुपारी जेवणाच्यावेळी मात्र चौघांनाही मोकळीक देण्यात आली. जेवणानंतर पुन्हा चौकशी सुरू झाली ती रात्रीपर्यंत सुरू होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोणत्या प्रकारचे, कशासंबंधित प्रश्न विचारले याबाबत मात्र चौकशीला सामोरे गेलेल्यांनी सांगण्याचे टाळले.