उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आवाहन
विजय मळीक /लखनौ
गोवा हे विकसित होणारे नमुनेदार राज्य असून त्याचा आदर्श सर्व राज्यांनी घेण्यासारखा आहे, असे निवेदन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोव्यातील पत्रकारांशी बोलताना केले आणि आगामी लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशात भाजप बहुमताने केंद्रात सत्तेवर येईल, तसेच नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होतील, असे दावा त्यांनी केला. गोव्यातील पत्रकारांच्या एका गटाने त्यांची लखनौ उत्तर प्रदेश येथील सरकारी निवासस्थानी भेट घेतली, तेव्हा त्यांनी गोवा पत्रकारांशी सुमारे तासभर मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि गोवा राज्याविषयी प्रेम व्यक्त केले. गोवा राज्यातील पत्रकारांचे त्यांनी दिलखुलासपणे स्वागत केले. ते म्हणाले की उत्तर प्रदेश राज्याची लोकसंख्या सुमारे 25 कोटी असून ती 75 जिल्ह्यात सामावलेली आहे. एक जिल्हा एक उत्पादन अशी योजना सरकारने चालीस लावली असून गावातील 40 लाख पारंपरिक कारागिरांना त्यात सामावून घेण्यात आले आहे. त्यांना बँकेतून कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून आर्थिक स्वावलंबन आणि गरीबी दूर करणे हा त्यामागील हेतू आहे.
उत्तर प्रदेशातील या कोटी लोकसंख्येत मुस्लीम लोकसंख्या 6 कोटी असून 2012-17 या 5 वर्षात राज्यात 700 दंगली झाल्या. परंतु त्यानंतर मात्र 2017 ते 2023 म्हणजे आतापर्यंत एकही दंगा झाला नाही. सर्व धर्मांचे प्रांताचे लोक राज्यात सुरक्षित असून कायदा सुव्यवस्थेवर राज्याची मजबूत पकड आहे. ती नियंत्रणात असल्याचा दावा त्यांनी केला. उत्तर प्रदेश भारत देशातील सर्वात मोठे राज्य असून ते विकसित झाले. पुढे गेले तरच भारत देश पुढे जाईल. देशासाठी मोदी मॉडेल महत्त्वाचे असून तेच विविध राज्यातून देशातून पुढे नेले जात आहे. गुजरात मॉडेल किंवा उत्तर प्रदेश मॉडेलला संबंध देशाशी जोडण्यास त्यांनी नकार दर्शवून आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असल्याचे संकेत दिले. उत्तर प्रदेश राज्य नेपाळ देशासह बिहार, राज्यस्थान, झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड, दिल्ली या राज्यांशी जोडलेले असून त्या सर्व सीमांशी जोडणारे रस्ते 4 पदरी हायवे करण्याची योजना आहे. राज्याची एकूण 5 गटात विभागणी करण्यात आली असून त्यात बुंदेलाखंड, लखनौ, सेंट्रल युपी, इस्टर्न युपी व वेस्टर्न युपी यांचा समावेश आहे. त्यानुसार त्या गटाचे विकासाची योजना आखण्यात आली आहे. पंचायतीत ग्रामसचिव नियुक्त करण्यात आले असून त्यांना गावातील लोकांना सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे देण्याचे अधिकार दिल्याचे योगी म्हणाले. राज्यात 80,000 रेशन दुकाने असून त्याच्या माध्यमातून जनतेला धान्य पुरवण्यात येते. जनता त्यावर संतुष्ट आहे. उत्तर प्रदेशात सध्या 9 विमानतळे कार्यरत असून 12 नवे विमानतळ बांधण्यात येतील. मग एकूण विमानतळांची संख्या 21 होणार असून त्यात 5 आंतरराष्ट्रीय असतील, अशी माहिती योगी यांनी दिली.