अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत उद्धवाला आत्मज्ञानी माणसाची वैशिष्ट्यो समजावून सांगत आहेत. ते म्हणाले, ज्ञाता मनुष्य सदैव निजात्मसुखात नहात असतो. देहात असून त्याला देहाच्या सुखदु:खाची जाणीव नसते मग तो देहाच्या कर्मात कशाला अडकेल? तो तर परमात्मसुखाने संतुष्ट झालेला असतो. सामान्य माणसाला कर्माचं बंधन असतं पण सर्व कर्मे करूनसुद्धा सज्ञानाला कर्मबंधन बाधू शकत नाही कारण तो संपूर्ण निरपेक्ष असतो. तो करत असलेल्या कोणत्याही कर्मातून मला अमुक एक मिळवायचं आहे असा विचार त्याच्या मनात कधीही येत नाही. त्याच्याही पुढं जाऊन कर्म केल्यावर फळ तर मिळणारच ह्या न्यायाने ईश्वरी इच्छेनुसार जे काही फळ मिळेल ते तो ईश्वरालाच अर्पण करून टाकतो.
ज्ञानी माणसाची कर्माबद्दलची अशी उदासीनता भगवंतांच्या तोंडून ऐकल्यावर, उद्धवाच्या मनात अशी शंका आली की, कर्म करून जर त्याला काहीच मिळवायचं नसेल तर तो कर्म तरी कशाला करत असेल? उद्धवच्या मनातला विचार भगवंतानी लगेच ओळखला. नाहीतरी ते ह्याविषयावर उद्धवाशी बोलणार होतेच. उद्धव आपलं बोलणं मनापासून ऐकतोय हे लक्षात आल्यावर भगवंत अधिक समरसून बोलू लागले.
ते म्हणाले, उद्धवा लोकांना तो कर्म करताना दिसतो ह्यावरून असं वाटतं की, हाही चार लोकांच्याप्रमाणे कर्म करतोच आहे की, मग ह्याच्यात आणि इतरांच्यात काय फरक आहे? तर फरक हाच की, तो प्रपंचातली कामे कर्तव्य म्हणून करत असतो परंतु त्याला त्याबद्दल मी कर्म करतोय अशी काडीमात्र अहंता वाटत नसते. मी कर्ता नाही अशी खात्री असल्याने माझ्याकडून कर्म करून घेणारा कुणीतरी वेगळाच आहे ह्याची जाणीव असल्याने कर्तव्य करत असतानासुद्धा त्याला आत्मस्वरूपाचे भान असते. खरे म्हणजे मनुष्य प्रपंचात गुंतला की, तो निजात्मता विसरून जातो पण अनन्य भक्ताने निजात्मता इतकी वश करून घेतली असते की, प्रापंचिक कर्मे करत असतानाही त्याला आत्मस्वरूपाचा यत्किंचितही विसर पडत नाही कारण प्रापंचिक कर्मातील त्यांची गुंतवणूक शून्य असते. अज्ञानी माणसाने प्रपंचाचे भान पूर्णत: राखलेले असल्याने तो मनाने त्यात पूर्णपणे गुंतलेला असतो, प्रपंचाची त्याला आत्यंतिक ओढ वाटत असते आणि विषयोपभोगातून सुख मिळते ह्यावरही त्याचा विश्वास असतो. साखरेचे कारले जरी केले तरी ते गोडच लागते, त्याप्रमाणे प्रपंचातली सुखदु:खे अज्ञानी माणसाला भावतात. ह्याउलट ज्ञानी माणसाला प्रपंच पूर्णपणे ब्रह्मरूप वाटत असतो. ब्रह्म सर्वव्यापी असल्याने त्याला प्रपंचातली सुखदु:खे मिथ्या वाटत असतात. सामान्य माणसाला प्रपंच मिथ्या आहे ह्याची जाणीव खूप उशिरा होते आणि मग तो ब्रह्मभाव मानू लागतो परंतु ज्ञानी मनुष्य सुरवातीपासून परब्रह्म हेच खरे धरून चालतो. अंधारातला दोर माणसाला खराखुरा साप वाटतो, आता तो आपल्या अंगावर उडी मारेल, चावेल असे अनेक तर्कवितर्क करतो आणि ते तसंच होईल असे मानून घाबरतो. त्याप्रमाणेच सामान्य माणूस संसारात घडणाऱ्या अनेक गोष्टींचा स्वत:च्या बुद्धीनुसार अर्थ लावत असतो आणि त्या खऱ्या धरून चालतो. त्यामुळे प्रपंचाचे भान माणसाला बाधते परंतु स्वानुभवाने सज्ञान मनुष्य केवळ एक परब्रह्म सत्य मानत असल्याने त्याला प्रपंचातल्या गोष्टी मिथ्या वाटतात. त्या प्रत्यक्ष समोर दिसत असल्या तरी त्या खोट्या आहेत हे तो पुरेपूर जाणून असतो. ज्याप्रमाणे झोप लागल्यावर स्वप्न पडते. त्यातील गोष्टी मनुष्य जोपर्यंत झोपेत असतो तोपर्यंत त्याला खऱ्या वाटतात परंतु जाग आल्यावर त्या निरर्थक ठरतात. त्याप्रमाणे सज्ञानी माणसाला प्रपंच हा स्वप्नातल्या गोष्टीप्रमाणे वाटतो. तो निजात्मस्वरूपाबाबत जागृत असल्याने प्रपंच मिथ्या आहे ह्याबद्दल त्याला बालंबाल खात्री असते. असे प्रपंचाचे मिथ्यत्व ज्यांनी जाणले त्यांना कर्मे केल्यावर मी कर्म केले असा देहाभिमान कधीच उत्पन्न होत नाही.
क्रमश: