सीसीटीव्ही असूनही चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ : पोलिसांच्या जुजबी कारवाईमुळे चोरांचा बिनधास्त वावर
संग्राम काटकर/कोल्हापूर
अंबाबाई मंदिरात देवीचे दर्शन घेतेवेळी भाविकांना बाजूच्या भुर्रट्य़ा चोरांपासून खूप सावध रहावे लागेल, अशी सद्यस्थिती आहे. कोणत्या चोराकडून मोबाईल, पर्स, पाकिट व दागिने मारले जातील, याचा काही नेम नाही. दर्शन घेतेवेळी भाविक तल्लीन झाल्याचा अंदाज घेऊन चोर डाव साधताहेत. गेल्या दोन वर्षात मंदिराच्या कासव व गणपती चौकासह आवारात चोरीचे बरेच प्रकार घडले आहेत. गेल्याच आठवड्य़ात अहमदनगरच्या दोन महिला चोरट्य़ांनी भाविकांची पाच ग्रॅम सोन्याची अंगठी व पाच हजार रुपये चोरल्याचा प्रकार घडला आहे. मंदिरात तिसरा डोळा म्हणून कार्यरत असलेल्या 30 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे चोरी उघडकीस आणून चोरट्य़ांना पोलीसांच्या स्वाधिन केले. तसेच चोरलेल्या वस्तूही भाविकांना परत केल्या आहेत.
पण चोरट्य़ांविरोधात फिर्याद देण्यासाठी भाविक पुढे येत नसल्याने पोलिसांना चोरावर कडक कारवाई करण्यात मर्यादा येतात. शिवाय हेच चोर पुन्हा काही दिवसांनी मंदिरात चोरीसाठी येत असतात. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश, गुजरातसह देशभरातील भाविक कोल्हापूरात येत असतात. ते वाहनतळावर आपल्या वाहनातून उतरले की त्यांना भुर्रटे चोर हेरतात. त्यांच्या पाठीमागून थेट मंदिरातही येतात. त्यांना अंबाबाईच्या दर्शनासाठी कुठे गर्दी होते, शिवाय दर्शन घेतेवेळी भाविक कसा तल्लीन होता, याची पक्की जाणिव आहे. त्यामुळे हे चोर पद्धतीरपणे पाकिट, दागिने, मोबाईल, पर्स मारुन नामानिराळे होतात. जेव्हा भाविकांना आपली वस्तू चोरीला गेली हे लक्षात येते तेव्हा ते मंदिरातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाकडे धाव घेऊन चोरीची माहिती सांगतात. मग कक्षातील सीसीटीव्ही नियंत्रक राहुल जगताप व अभिजित पाटील हे भाविकाला कुठल्यावेळी तुम्ही कुठे होता, तुमची वस्तू कधी चोरली याची माहिती घेऊन मंदिर व आवारातील 80 सीसीटीव्हीद्वारे चोरांचा मागसूस घेण्यास सुरुवात करतात.
हे ही वाचा : आषाढी एकादशीला कुर्बानी नाही;कुंडलमधील मुस्लिम समाजाचा निर्णय
शिवाय देवीचे दर्शन घेतेवेळी भाविकाच्या अगदी जवळ कोण आहे, याची फुटेजद्वारे पाहणी करतात. शिवाय संबंधीत व्यक्ती भाविकांच्या पाठीमागे केव्हापासून आहे, हेही पाहतात. एका विशिष्ठय़ टफ्फ्यावर चोरी करणारी व्यक्ती भाविकाची वस्तू कशी चोरत हेही सीसीटीव्ही फुटेज स्लो-मोशन करुन पाहतात. यानंतर चोर कोण आहे हे निश्चित करुन त्याला पकडण्याच्या सुचना सुरक्षा रक्षकांना देतात. रक्षक चोराला पकडून पोलीसांकडे देतात. पण पकडलेल्या चोराविरुद्ध भाविक फिर्याद देण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे पोलीसांना कडक कारवाई करण्यात मर्यादा येतात. त्यामुळे पकडले गेलेले चोर काही महिन्यांनंतर पुन्हा अंबाबाई मंदिरात येतात. गेल्याच महिन्यात मंदिरात चोरी करणाऱया महिलांना पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले होते. काही दिवसांनी याच महिलांनी वाडीरत्नागिरीवर जोतिबा मंदिरात चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसले होते, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले आहे. या चोरटय़ांना पोलीसांची कसली ती भीतीच राहिलेली नाही. शिवाय चोरी करताना जरी सापडलो तरी कठोर शिक्षा नाही, हे पक्के असल्याने चोर बिनधास्तपणे अंबाबाई व जोतिबा मंदिरात वावरत आहेत.
चोर अशी करतात चोरी…
अंबाबाई मंदिराच्या दर्शन रांगेतील ज्या भाविकाकडील वस्तू चोरायच्या आहेत, त्याच्या अंगाला चोर सतत चिकटून राहतात. गर्दीचा अंदाज घेऊन भाविकाला पुढे-पुढे ढकलू लागतात. भाविक अंबाबाईचे दर्शन घेण्यात तल्लीन आहे अथवा बेसावध आहे, याचा अंदाज घेऊन चोर बरोबर मोबाईल, पर्स, पाकिट व दागिने चोरतात. चोरलेली वस्तू लागलीच जवळच्या सहकाऱ्याकडे देऊन नामानिराळे होतात. पण चोरीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होता. त्याच्या सहाय्याने चोरांना पकडले जाते.
तीन चोरटय़ांना अटक…
चोरीबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार 3 चोरांना पोलिसांना अटक करुन न्यायालयात हजर केले आहे. चोरीबाबत फिर्यादच मिळाली नाही तर चोरट्य़ांवर कारवाई करण्यात पोलिसांना मर्यादा येत आहेत. तेव्हा भाविकांनी आपल्याकडील वस्तू चोरीला गेल्यास तातडीने पोलिसांकडे फिर्याद द्यावी. जोपर्यत फिर्यादी वाढणार नाहीत, तोपर्यंत अंबाबाई मंदिरातील चोरीच्या प्रकाराला कायमचा आळा घालता येणार नाही.
दत्तात्रय नाळे (पोलीस निरीक्षक : जुना राजवाडा पोलीस ठाणे)
हे ही वाचा : शिंदेंचं समर्थन भोवलं; सेनेतून दोन बड्या नेत्यांची हकालपट्टी