बेळगाव जिल्हय़ात बेंगळूरपेक्षा अधिक मृत्यू
प्रतिनिधी / बेळगाव
बेंगळूरपेक्षा बेळगाव जिल्हय़ात अपघातातील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. विनाहेल्मेट दुचाकीस्वारांच्या मृत्यूंचे प्रमाण अधिक असून कर्नाटकात रोज 7 ते 8 जणांचा हेल्मेट नसल्यामुळे मृत्यू होत आहे.
विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱयांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढले असून बेळगावने बेंगळूरलाही मागे टाकले आहे. 2018 ते 2022 पर्यंत वाहन अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 60 टक्के जणांचा हेल्मेट नसल्यामुळे मृत्यू झाला आहे. अपघात व अपघातातील मृत्यूचे प्रमाण घटविण्यासाठी वेळोवेळी वाहतूक पोलीस व आरटीओंकडून जागृती केली जाते. जागृतीनंतरही नियमांचे पालन झाले नाही तर दंडात्मक कारवाईही केली जाते. उपलब्ध माहितीनुसार 2021-22 मध्ये बेळगाव जिल्हय़ात 816 विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू झाला आहे. दुसरा क्रमांक बेंगळूरचा लागतो. या काळात 633 विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. तुमकूर जिल्हय़ात 596, म्हैसूर जिल्हय़ात 510 व बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ात 507 जणांचा हेल्मेट नसल्यामुळे अपघाती मृत्यू झाला आहे. बेळगावसह राज्यात रोज सरासरी 95 इतके अपघात घडतात. 27 हून अधिक जणांचा अपघातात मृत्यू होतो, अशी माहिती मिळाली आहे.