चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याने घेतला निर्णय, आशियाई युवा क्रीडा स्पर्धाही रद्द
वृत्तसंस्था/ ताश्कंद-बीजिंग
चीनमधील हांगझोयू येथे होणारी 19 वी आशियाई क्रीडा स्पर्धा अनिश्चित काळासाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे. 10 ते 25 सप्टेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार होती. चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे चिनी मीडियाने वृत्त दिले आहे. या घडामोडीनंतर भारतीय क्रीडा क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. याशिवाय डिसेंबरमध्ये होणारी आशियाई युवा क्रीडा स्पर्धाही रद्द करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले.
या स्पर्धेच्या नवीन तारखांची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. शांघायमध्ये कोरोना महामारीचा प्रकोप वाढू लागल्यानंतर तेथे लॉकडाऊन करण्यात आले. त्यावेळीच या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाबाबत साशंकता निर्माण झाली होती. ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाच्या (ओसीए) कार्यकारी मंडळाची शुक्रवारी ताश्कंदमध्ये या संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली आणि सद्यपरिस्थितीत स्पर्धा लांबणीवर टाकणे हाच योग्य निर्णय असल्याचे मत त्यात मांडण्यात आले. ‘चायनीज ऑलिम्पिक समिती, हांगझोयू आशियाई गेम्स आयोजन समिती यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर ओसीएने सप्टेंबरमध्ये होऊ घातलेली ही स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या नवीन तारखाबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल,’ असे ओसीएने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
याशिवाय 20-28 डिसेंबर या कालावधीत चीनमधील शांटोयू येथे होणारी तिसरी आशियाई युवा क्रीडा स्पर्धाही रद्द करण्यात आली आहे. आता पुढील आशियाई युवा क्रीडा स्पर्धा ताश्कंद, उझ्बेकिस्तान येथे 2025 मध्ये घेतली जाणार आहे.
आशियाई स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय ऍथलीट्ससाठी धक्कादायक असल्याचे मत भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) व्यक्त केले आहे. ‘एखादी मोठी स्पर्धा रद्द होणे किंवा लांबणीवर टाकणे हे क्रीडापटूंसाठी निराशाजनकच असते. अशा स्पर्धा नव्याने घेतल्या जातात त्यावेळी त्यांचे वय थोडय़ा प्रमाणात का होईना, वाढलेले असते. याचा त्यांच्या कामगिरीवर निश्चितच परिणाम होत असतो,’ असे आयओएचे सरचिटणीस राजीव मेहता म्हणाले. ‘आपल्या अनेक क्रीडापटूंनी या स्पर्धेच्या तयारीला सुरुवात केली होती. कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर या निर्णयाची अपेक्षा केली जात होती. पण या गोष्टी आपल्या हातात नाहीत. खेळाडूंबाबत मात्र थोडे वाईट वाटते,’ असेही ते म्हणाले.
भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक पीआर श्रीजेश म्हणाला की, निर्णय निराशाजनक असला तरी तयारीसाठी सर्वांना आणखी वेळ मिळणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या पुरुष व महिला संघाला 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे. ‘निर्णय अपेक्षितच होता, पण निराशा झाली असली तरी त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहावे लागेल. स्पर्धा लांबणीवर पडल्यामुळे तयारी करण्यासाठी आम्हाला आणखी अवधी मिळणार आहे,’ असे तो म्हणाला. ‘यातील पॉझिटिव्ह बाब म्हणजे आमच्या अनेक स्पर्धा होणार आहेत, त्यात आशिया चषक, बेल्जियममधील प्रो लीग सामने, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि पुढील वर्षी होणारी विश्वचषक स्पर्धा यांचा त्यात समावेश आहे. स्पर्धेच्या नवीन तारखा अद्याप जाहीर व्हावयाच्या आहेत. त्यामुळे त्याची तयारी करण्यासाठी आमच्याकडे पुरेसा वेळ असेल,’ असेही तो म्हणाला.
अ.भा. टेनिस संघटनेने मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे आता नॉर्वेविरुद्ध होणारी डेव्हिस चषक लढत व आशियाई स्पर्धा यांच्यात क्लॅश होणार नाही, हे आमच्यासाठी फायद्याचेच झाले आहे. केवळ सात दिवसांच्या फरकाने दोन मोठय़ा स्पर्धा आपल्या खेळाडूंना खेळाव्या लागणार होत्या. ते दडपण आता त्यांच्यावर असणार नाही. दोन्ही स्पर्धांसाठी आता सर्वोत्तम संघ पाठवता येईल, असे सरचिटणीस अनिल धुपर म्हणाले. 16-17 किंवा 17-18 सप्टेंबर रोजी भारताची डेव्हिस चषक लढत होणार आहे.