खणलेल्या रस्त्यांकडे दुर्लक्ष, चांगल्या रस्त्यांवर डांबरीकरण : नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया
पणजी : राजधानी पणजीत चांगल्या रस्त्यांचे डांबरीकरण होत असल्याने आश्चर्य प्रकट करण्यात येत असून खणलेले रस्ते मात्र डांबरीकरण न करता तशाच अवस्थेत ठेवल्याने संतापही व्यक्त होताना दिसत आहे. जी-20 जागतिक शिखर परिषदेच्या बैठका पणजीत होणार असल्याने हे रस्ते चकाचक करण्यात येत असून मळा-कोर्तिन भागातील पोर्तुगिजकालीन जुने घरे असलेल्या ठिकाणचे रस्तेही डांबरीकरण होत असल्याने बैठकीसाठी येणारे प्रतिनिधी त्या भागात फेरफटका मारण्यासाठी जाणार की काय? असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मळा भागात करण्यात आलेल्या विविध रस्त्यांच्या डांबरीकरणामुळे तेथील रहिवाशांना दिलासा मिळाला असून तेथील शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावरील धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत होता, तो आता कमी झाल्याने त्यांनाही दिलासा लाभला आहे. डांबरीकरणामुळे रस्ते उंच झाले असून साईडपट्टीकडे खळी तयार झाली आहे. त्यात वाहनांची चाके अडकून पडण्याची भीती निर्माण झाली असून ती खळी भऊन काढण्याची गरज व्यक्त होत आहे.
ज्या रस्त्यांचे डांबरीकरण झाले त्या रस्त्याला जोडणारे इतर रस्ते समपातळीवर करण्यात न आल्याने जोडरस्त्यावर जाताना वाहनांना मोठे धक्के बसतात असा वाहन चालकांचा अनुभव आहे. जोडरस्त्यांच्या ठिकाणी समपातळी करण्यात यावी अशी वाहन चालकांची मागणी आहे. ओल्ड गोवा – रायबंदर पर्यंतच्या रस्त्यावरही डांबर घालण्यात आले असून मिरामार – राजभवन पर्वरी पर्यंतचा रस्ताही डांबरीकरण करण्यात आला. चांगल्या रस्त्यावरही डांबर घालण्यात आल्यामुळे हा विनाकारण खर्च होत असल्याचे समोर येत असून जी-20 परिषदेचे प्रतिनिधी ज्या मार्गावऊन ये-जा करणार आहेत तेच रस्ते नव्याने डांबरीकरण करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरातील अनेक अंतर्गत रस्ते खराब झाले असून तेथे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे. जी-20 परिषदेच्या प्रतिनिधींना दाखविण्यासाठी हा डांबरीकरणाचा ‘शो’ चालू असून अंतर्गत खणलेले रस्ते केव्हा दुऊस्त करणार आणि तेथे केव्हा डांबरीकरण होणार? अशी विचारणा करण्यात येत आहे. त्याचे उत्तर मात्र कोणाकडे नाही.